
आमदार राहुल कुल यांच्या प्रयत्नांना यश!
प्रत्यक्ष कार्यवाहीला गती देण्याचे ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश
यवत-मुळशी प्रकल्पाद्वारे कृष्णा खोऱ्यातील नैसर्गिकरित्या पूर्वेकडे वाहणारे पाणी जे वीज निर्मितीसाठी कृत्रिमरित्या पश्चिमेकडे वळविण्यात आले होते, ते पुन्हा पूर्वेकडील खोऱ्यात वळविण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावाबाबत मंत्रालयात महत्त्वाची बैठक पार पडली. दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्यामुळे आणि विनंतीनुसार आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जलसंपदा विभागाचे सचिव श्री. संजय बेलसरे, विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, तर टाटा प्रकल्पाचे अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.
मुळशी धरणाचे पाणी वीजनिर्मितीसाठी पश्चिमेकडे वळवले जाते, मात्र हे पाणी पुन्हा पूर्वेकडील भीमा-कृष्ण खोऱ्यात वळवल्यास पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो, अशी भूमिका आमदार राहुल कुल यांनी सातत्याने मांडली आहे. मार्च २०२४ मध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत झालेल्या निर्णयानुसार, पहिल्या टप्प्यात पिण्यासाठी पाणी वळविण्यास मंजुरी मिळाली होती. याच निर्णयाची आता प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, यासाठी आमदार कुल यांनी बैठकीत आग्रही मागणी केली.
पहिल्या टप्प्यात जे पाणी पिण्यासाठी वळवण्याचा निर्णय झाला आहे, त्या कामाची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. टाटा पॉवरच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी वळवण्याच्या प्रक्रियेतील तांत्रिक अडथळे दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, जलसंपदा मंत्र्यांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे काम अत्यंत प्रभावीपणे आणि विहित वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
या बैठकीबाबत बोलताना आमदार राहुल कुल म्हणाले की, “नैसर्गिकरित्या पूर्वेकडे वाहणारे पाणी कृत्रिमरित्या वळवल्यामुळे आपल्या भागावर अन्याय होत होता. हे पाणी पुन्हा आपल्या खोऱ्यात आल्यास पाणी व्यवस्थापन अधिक सक्षम, समतोल आणि शाश्वत होईल. हा निर्णय राज्याच्या सिंचन इतिहासात मैलाचा दगड ठरेल.