
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांना शोधण्यात केंद्र सरकारला अद्याप यश आलेले नाही. दहशतवाद्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही लक्षात राहील,असा धडा शिकवणे गरजेचे होते. परंतू पाकिस्तानशी युद्ध करणे किंवा मॉकड्रील आणि एअरस्ट्राईक या गोष्टी फायद्याच्या नाहीत. पाकिस्तान हा अगोदरच बर्बाद झालेला देश आहे. त्यांना आणखी काय बर्बाद करणार? अमेरिकेत दहशतवाद्यांनी ट्विन टॉवर पाडले आणि पँटागॉनवर हल्ला केला तेव्हा अमेरिकेन त्या दहशतवाद्यांना शोधून ठार मारले. त्यामुळे दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे प्रत्युत्तर नसते. त्यामुळे देशात मॉकड्रील करण्याऐवजी कोम्बिंग ऑपरेशन करा. देशातील आपलेच प्रश्न संपत नाही, अशा परिस्थितीत युद्धाला सामोरे जाणे योग्य गोष्ट नाही, असे परखड मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यास ठोस प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्य दलाने मंगळवारी ७ मे रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये विमानाच्या सहाय्याने एअर स्ट्राईक मारा करून दहशतवाद्यांचे ९ तळ उद्धवस्त केले. या मोहीमेला ‘ऑपरेशन सिंदूर असे म्हटले जात आहे. या मोहीमेत पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले. तसेच कुख्यात दहशतवादी मसूद अजहर यांच्या कुटुंबीयांसह तब्बल ९० दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातून भारतीय सैन्यदलाचे आणि पंतप्रधान मोदी तसेच केंद्र सरकारच्या निर्णय क्षमतेचे कौतुक होत असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना खडे बोल सुनावले आहेत.
राज ठाकरे यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील सुरक्षा यंत्रणांच्या त्रुटींवर बोट ठेवत म्हटले आहे की, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजून सापडलेले नाहीत. दरवर्षी हजारो पर्यटक जिथे जातात, तिकडे सुरक्षा का नव्हती, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे या दहशतवाद्यांना कोम्बिंग ऑपरेशन करुन हुडकून काढणे जास्त महत्त्वाचे आहे. त्याऐवजी एअर स्ट्राईक करुन लोकांचं लक्ष भरकटवणं किंवा युद्ध करणे हा पर्याय नाही, अशी टिकाही राज ठाकरे यांनी केली आहे.
सरकारच्या जिथे चुका होतात त्या चुका दाखवल्याच पाहिजेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावेळी पंतप्रधान मोदी सौदी अरेबियात होते. तो दौरा अर्धवट सोडून भारतात आले आणि थेट बिहारला प्रचाराला गेले. ही गोष्ट करण्याची गरज नव्हती. त्यानंतर मोदी केरळमध्ये अदानींच्या बंदराचे उद्घाटन करायला गेले. यानंतर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित व्हेव कार्यक्रमाला उपस्थिती लावली. इतकी गंभीर परिस्थिती असताना या गोष्टी त्यांना टाळता आल्या असत्या, असे खडे बोल राज ठाकरे यांनी सुनावले आहेत.
मोठमोठ्या शहरात नाक्यानाक्यावर ड्रग्ज मिळतात. ते येतात कुठून? का येतात ? लहान लहान पोरं ड्रग्ज घेतायत. शाळेतली पोरं ड्रग्ज घेतायत. ऑपरेशन सिंदूरसारखी नावं देऊन काही साध्य होत नाही. तुम्ही नेमकी काय पावलं उचलणार आहात, असा सवाल करून इतके दिवस जे कार्यक्रम मोदींनी घेतले त्याची गरज नव्हती, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.