


नगर मार्गावरील कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गाची दुरवस्था झाल्याने या मार्गाचे तीनतेरा वाजून येथे सुरक्षा रक्षकच नसल्याने येथून पायी जाणाऱ्या महिलांचा जीव टांगणीला लागला असून या कामासाठी करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात गेला असल्याची म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
नेहमी वाहनांच्या वर्दळीने गजबजलेल्या पुणे_नगर मार्गावर यापूर्वी रस्ता पार करताना अनेक पादचारी नागरिकांना जीव मुठीत घेऊन जाण्याची वेळ येत असताना अनेकदा या मार्गावर छोट्या मोठ्या अपघातासह अनेक निष्पाप जीवांना जीव गमविण्याची वेळ येत असल्याने मुख्य अडचणीतून नागरिकांची सुटका होण्याच्या उद्देशाने प्रशासनाच्या वतीने भाजी मंडईकडे जाणाऱ्या मार्गालगतच कोट्यवधी रुपये खर्च अंदाजे दहा ते बारा वर्षापूर्वी भुयारी मार्ग उभारून याचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व तत्कालीन महापौर मोहन राजपाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते.यामुळे भाजी विक्रेत्यासह, शालेय विद्यार्थी, कामगार वर्ग यांनी सुटकेचा श्वास सोडला होता. यापूर्वी भुयारी मार्गालगत बीआरटी मार्गात प्रवासासाठी बसशेड उभारण्यात आल्याने बस प्रवाशी संबंधित भुयारी मार्गाचा वापर करत होते.मात्र आता बीआरटी व बसशेड हटविण्यात आल्याने काही प्रमाणातच नागरिक भुयारी मार्गाचा वापर करत आहेत. पण प्रशासन अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे सध्या कोणी ही याकडे लक्ष देत नसल्याने त्याची दुरवस्था झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
नागरिकांना यातून जाण्यासाठी उभारण्यात आलेल्या पायऱ्या(जिना)हा गुटख्याच्या पिचकऱ्यांनी रंगल्याने असलेला भुयारी मार्ग हा गुटख्याच्या पिचकऱ्यांचे आगार बनले आहे.विशेष सध्या येथील विद्युतपुरवठा जरी सुरळीत चालू असला तरी पण त्याच्या असणाऱ्या विद्युत केबल ह्या उघड्यावर अस्ताव्यस्त अवस्थेत पडल्याने शॉर्टसर्किटमुळे काही अनर्थ प्रकारची दुर्घटना घडली तर यास जबाबदार कोण? असा संतप्त सवाल नागरिकांकडून करण्यात येत असताना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहत असल्याने एखाद्या दिवशी शॉर्टसर्किटमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तर विद्युत मित्राचा लोखंडी बॉक्स देखील तुटलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे.तर भुयारी मार्गाच्या भिंतींना बसविण्यात आलेल्या संगमरवरीच्या फरशा देखील फुटलेल्या अवस्थेत असल्याने येथील या मार्गाला वाली कोण? हा प्रश्न नागरिकांना सतावत आहे.
काही वर्षांपासून ही समस्या नागरिकांना जाणवत असताना येणाऱ्या नागरिकांना मुख्य प्रश्न भेडसावत आहे. तो म्हणजे सुरक्षा रक्षकाचा हा मार्ग उभारल्यापासून आजपर्यंत प्रशासनाच्या वतीने अद्याप ही सुरक्षा रक्षक नेमण्यात न आल्याने विशेष करून महिलांना या ठिकाणाहून दिवसा ही जाताना जीव मुठीत घेऊन जाण्याची वेळ येते.तर रात्रीच्या सुमारास अनेक भाजी विक्रेते व महिला ग्राहक याच मार्गाचा वापर करत आहेत.त्यामुळे येथे सुरक्षा रक्षकच नेमण्यात न आल्याने महिलांचा जीव टांगणीला लागून त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अगोदरच शहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत दिवसेदिवस वाढ होत असताना दुसरीकडे अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याबरोबरच येणारे जाणारे पादचारी नागरिक येथे कचरा टाकत असल्यामुळे ते कचऱ्याचे आगार बनून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनून पालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.विशेष करून येरवडा_नगर महामार्गावर विमाननगर व चंदननगर चौक तर येरवडा आळंदी मार्गावर इंदिरानगर_फुलेनगर भागाला जोडण्यासाठी असे तीन भुयारी मार्ग उभारण्यात आले आहेत.मात्र पालिका प्रशासन अधिकाऱ्यांच्या गलथान कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसून हे तीन ही भुयारी मार्ग सध्या धूळखात पडून असल्याने पालिका प्रशासनाच्या भुयारी मार्गाच्या कामासाठी करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांच्या खर्चाचा चुराडा झाला असल्याने जनतेचा असलेला पैसा हा पाण्यात गेला असल्याचे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बिकट झालेल्या भुयारी मार्गाची लवकर दुरुस्ती करण्यात यावी.जेणे करून भविष्यात होणाऱ्या अनेक दुर्घटना यामुळे टळतील अशी नागरिकांची मागणी आहे.______
जनतेच्या कररूपी पैशातून संबंधित भुयारी मार्ग बनविण्यात आला असताना अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे हा मार्ग समस्यांच्या विळख्यात अडकला असेल तर जनतेने न्याय मागायचा कोणाकडे?हा सवाल उपस्थित होत आहे
आज खरोखरच अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करण्याची वेळ येत असल्याने प्रशासन अधिकारी खरोखरच मुख्य समस्येमुळे जनतेचे प्रश्न सोडवण्यास सक्षम आहेत का?असा विचार सध्या जनतेला पडत आहे.