

पंचतारांकित उद्योगनगरी म्हणून अल्पावधीत नावारूपास आलेल्या चाकण व चाकण औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधा कोलमडल्या असून, नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. रस्ते, पाणी, वीज व वाहतूक कोंडीमुळे सर्वचजण मरणयातना सहन करत असून, त्याच्या निषेधार्थ चाकण येथे गुरुवारी(दि.२५) उद्योजकांची महाबैठक आयोजित करण्यात आली आहे.
चाकण एमआयडीसीतील निघोजे गावच्या हद्दीतील सह्याद्री इंडस्ट्रीज फेज नं.३ मध्ये सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास या महाबैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ट्रॅफिकमुक्त चाकण कृती समिती, सर्व उद्योजक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. या बैठकीत रस्ते, ट्रॅफिक समस्या, प्रलंबित प्रकल्प आणि ठोस उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
हा विषय फक्त ट्रॅफिकपुरता मर्यादित नाही तर, उद्योग नगरीतील कामगारांची सुरक्षा, उद्योगांचे सातत्यपूर्ण कामकाज, उत्पादन क्षमता आणि चाकण शहर व चाकण परिसराच्या शाश्वत विकासाशी निगडीत आहे. सर्वांच्या चर्चेतून परिवर्तन घडवून आणण्यासाठी उद्योग नगरीतील उद्योजक, नागरिक व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी या महाबैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ट्राफिक मुक्त चाकण कृती समिती व समस्त चाकणकर बांधवांनी केले आहे.