जहां नहीं चैना वहां नही रहना … म्हणणाऱ्या भुजबळांची नाराजी दूर 

Photo of author

By Sandhya

जहां नहीं चैना वहां नही रहना … म्हणणाऱ्या भुजबळांची नाराजी दूर

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची महायुतीचे बहुमताने सरकार आल्यानंतर त्यांची मंत्रीमंडळात वर्णी लागली नाही त्यामुळे ते नाराज होते. ते भाजपमध्ये जाणार अशाही चर्चा होत्या अनेकदा त्यांनी जहां नही चैना वहां नही रहना अशा शब्दात नाराजी व्यक्त केली होती. मात्र उशीरा का होईना त्यांची अखेर मंत्रिपदी वर्णी लागली आहे, त्यांनी मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या मंत्रीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.  
राज्यात पुन्हा एकदा बहुमतानं महायुतीचं सरकार सत्तेत आलं, मात्र त्यावेळी भुजबळ यांना मंत्रिपद मिळेल असे वाटत असताना त्यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली होती, त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद मिळाले होतं. मंत्रिपद  मिळाले नसल्याने भुजबळ नाराज होते, त्यांनी अनेकदा आपली नाराजी उघड व्यक्त केली होती. मात्र आता त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे.
भुजबळ यांच्या मंत्री होण्यावर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी भुजबळाचे स्वागत केले आहे. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी सर्व समावेशक मंत्रिमंडळ तयार केलं आहे. ओबीसी चेहरा असावा असं त्यांना आधीपासून वाटत होतं,  चुरस वगैरे मी मानत नाही. भुजबळांच्या मंत्रिपदाचा नाशिक आणि महाराष्ट्राला फायदा होईल, असा दावा मी कशावरच करत नाही, पक्ष महत्वाचा आहे. एकाच पक्षात राहून आपण गटबाजी करत राहिलो तर काही उपयोग होणार नाही, भुजबळ आणि माझ्यात कोणतेही मतभेद नाहीत. काही लोक उतावीळ आहेत. अजित पवार न्याय देतात. काही वेळेस वाट बघावी लागते. लगेच एखाद्या गोष्टीवर भाष्य करणं चुकीचं असतं, असं कोकाटे यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी भुजबळांना टोला देखील लगावला आहे. ‘जहा नही चैना, वहा नही रहना’ हे भुजबळांचे उतावीळ पणाचे वक्तव्य होतं. भुजबळ आमच्यापेक्षा देखील सिनियर आहेत. भुजबळांनी वक्तव्य करण्यापूर्वी वाट बघायला हवी होती, आता त्यांना न्याय मिळाला आहे, आम्हाला सगळ्यांना त्याचा फायदा होईल, असं कोकाटे यांनी म्हटलं आहे.
        छगन भुजबळ यांना बाबासाहेब पाटील यांच्याकडील सहकार खातं देण्यात यावा अशी सहकार मंत्री पाटील यांची मागणी होती परंतू भुजबळांना सहकार नको असे म्हणत त्यांनी अन्न व नागरी पुरवठा खातं घेणं पसंत केले आहे त्यामुळे भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा खातं मिळणार असल्याचे समजते.दरम्यान भुजबळांना मंत्रिपद मिळाल्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. यावर कोकाटे म्हणाले मनोज जरांगे यांचं ते व्यक्तिगत मत आहे. त्यांचं आणि भुजबळांचं काय आहे ते मला माहिती नाही, अजित पवार यांचं खंबीर नेतृत्व आहे. मी जर अजित पवार यांच्या लवकर जवळ गेलो असतो तर फायदा झाला असता, असो, देर आये दुरुस्त आये, असं म्हणत यावेळी त्यांनी आपल्या मनातील खंत देखील बोलून दाखवली आहे.

Leave a Comment