तक्रार न करणारे तक्रारवाडी गाव बनले तक्रारीचे केंद्रबिंदू

Photo of author

By Sandhya

भिगवण: पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील कधीही तक्रार न करणाऱे गाव म्हणून या गावाचा नावलौकिक असल्याने या गावाला ब्रिटिश काळापासुन तक्रारवाडी असे नाव आहे. परंतु अलीकडच्या काळात तक्रारवाडी हे गाव तक्रारीचे केंद्रबिंदू बनले असून या गावात रोज नवनवीन तक्रारी पुढे येत आहेत. शासनाची कोट्यावधी रुपयाची मालमत्ता काही लोकानी हडप करून अतिक्रमण केल्याचे व या अतिक्रमणाला राजकीय वरहास्त असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र उर्फ बाळासाहेब गोडसे यांनी ग्रामपंचायतच्या विद्यमान काही सदस्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याने त्यांचे सदस्यपद रद्द व्हावे यासाठी शासन दरबारी दाद मागितली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असतानाच या गावच्या विद्यमान महिला सरपंचानवर अविश्वासाचा ठराव गटविकास अधिकारी यांच्याकडे दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. या ठरावावर नऊ पैकी सात सदस्यांनी स्वाक्षरी केल्याचे समजते. पूर्वीपासून एकजीवाने वागणारे तक्रारवाडी गाव आज मात्र तक्रारीचे केंद्रबिंदू बनले असल्याने परिसरात याविषयी उलट सुलट चर्चा रंगू लागली असतानाच गावातील काही वयोवृद्ध व जाणकारांनी मात्र राजकारण बाजूला ठेवून सामंजसानी हा प्रश्न मिटवून गावाचे गावपण टिकवण्याची भावना व्यक्त होत आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page