नाझरे धरण परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा  

Photo of author

By Sandhya

पुरंदर तालुक्यातील नाझरे धरण जलाशयातील  पाणीसाठा हा  92 टक्के पेक्षा अधिक झाला असून कऱ्हा नदी पात्रातील पाणी धरणात प्रवाहित होत आहे. येत्या एक दोन दिवसांत धरण 100 टक्के भरणार असून धरण परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना नाझरे पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.मे महिन्यात मान्सून पूर्व पाऊस आणि जून महिन्यात मान्सून पाऊस जोरदार झाल्याने  नाझरे धरणात सध्या पाण्याचा येवा सुरू आहे. पाणलोट क्षेत्रातील पाण्याच्या येव्याचा दर पाहता पुढील 24 ते 48 तासात प्रकल्पातील पाणीसाठा 100 टक्के  होण्याचा अंदाज असून त्यानंतर पाणलोट क्षेत्रातील पाऊस व पाण्याच्या येव्या नुसार धरणाच्या सांडव्यावरून स्वयंचलित द्वारांद्वारे कर्‍हा नदीत विसर्ग सुरु होऊ शकतो.
 त्यामुळे नागरिकांनी कर्‍हा नदीपात्रात  उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावीत.  नदी किनार्‍यावरील सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचां इशारा  नाझरे धरण पूर नियंत्रण कक्ष तसेच नाझरे धरण शाखा अभियंता अनिल घोडके व विश्वास पवार यांनी दिला आहे.नाझरे धरणाची पाणीसाठा क्षमता पाऊण टीएमसी असून मृत साठा 200 दशलक्ष घनफूट आहे. पुरंदर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान 496 मिली मीटर असून मे व जून महिन्यात सरासरी पर्जन्यमान पातळी ओलांडली आहे. सध्या धरणात सुमारे 92 टक्के पाणीसाठा असून धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच जून महिन्यात धरण भरणार आहे.
नाझरे धरणात मुबलक पाणी साठा निर्माण झाल्याने धरणावर अवलंबून असणाऱ्या पुरंदर व बारामती तालुक्यातील 56 गावांचा पिण्याच्या पाण्याचा,शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page