


मुंबई/नागपूर : नागपूर विभागात झालेल्या घोटाळ्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी विधिमंडळ अधिवेशन समाप्त झाल्यानंतर एक महिन्याच्या आता मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने आयएएस, आयपीएस, विधी अधिकारी यांचा संयुक्त सहभाग असलेल्या चौकशी समितीची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आमदार संदीप जोशी यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात दिली.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज शुक्रवारी प्रश्नोत्तराच्या तासात आमदार संदीप जोशी यांनी नागपूर विभागात गाजत असलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भातील प्रश्न उपस्थित केले. आमदार संदीप जोशी यांनी या घोटाळ्याचा प्रारंभापासून पाठपुरावा केला. या प्रकरणात एसआयटी नेमण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी या मागणीला हिरवा कंदिल दाखविला होता. मात्र अद्याप एसआयटी समिती नेमण्यात आली नाही. ही समिती कधीपर्यंत घोषित करण्यात येईल, विशेष म्हणजे या घोटाळ्याची व्याप्ती चांदा ते बांदा अशी आहे. त्यामुळे घोषित करण्यात येणाऱ्या एसआयटीची कार्यकक्षा संपूर्ण महाराष्ट्रभर असावी. घोषित करण्यात येणारी एसआयटी 2 मे 2012 नंतर संपूर्ण राज्यात झालेल्या नियुक्त्या, बदल्या, शाळा हस्तांतरण तसेच शाळांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याच्या प्रकरणातील राज्यव्यापी घोटाळ्याची चर्चा करणार काय, यापूर्वी शिक्षण आयुक्तांनी नियुक्ती मान्यता प्रकरणात दोषी घोषित केलेल्या 59 शिक्षणाधिकारी यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई तत्काळ करणार काय, शिक्षण आयुक्तांनी प्रेषित केलेल्या फाईल्स मंत्रालयात मागील पाच-सहा वर्षांपासून दाबून ठेवणाऱ्या शिक्षण विभागातील झारीतील शुक्राचार्यावर कारवाई करणार काय, हा घोटाळा उघडकीस येऊ नये म्हणून घोटाळ्याशी संबंधित शेकडो नस्त्या नष्ट करण्यात आल्या. याबाबत संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार काय, या प्रश्नांचा समावेश होता.
या प्रश्नांना उत्तर देताना शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने अधिवेशन संपल्यानंतर एक महिन्याच्या आत एसआयटीमधील अधिकारी आणि सदस्यांची घोषणा करण्यात येईल. 59 शिक्षणाधिकाऱ्यांसंदर्भातील मागील पाच सहा वर्षांपासून प्रलंबित असलेल्या फाईलसंदर्भात तातडीने दखल घेत ती फाईल मागवून घेण्यात येईल आणि कारवाई होईल