रविवारी सकाळपासून धोम धरण व्यवस्थापनातील कनिष्ठ अभियंता स्वप्नील बोरसे हे धोम धरणापासून कालवा
तपासणी करत करत ते धरणापासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाईच्या मोतीबाग परीसरात दुपारी सुमारास
पोहचले असता त्या ठिकाणी कालव्याच्या मध्यभागी भले मोठे भगदाड पडलेले दिसले. खबरदारीचा उपाय म्हणून
त्यांनी तत्काळ कालव्याचे पाणी बंद केले. समयसूचकता बाळगून त्यांनी पाणी बंद केले नसते, तर कालवा फुटला
असता आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांसह माती वाहुन गेली असती. त्यामुळे शेतकऱ्यांचे कधीही
भरून न येणारे लाखो रुपयांचे नुकसान नक्कीच झाले असते यात शंका नाही.

धोमचे धरण हे १९७२ साली बांधण्यात आले. त्यावेळी बांधलेले कालवे हे दुतर्फा असणाऱ्या मातीच्या भरावाला
सिमेंटचे मजबूत प्लास्टर होते. आज या प्लास्टरला अंदाजे ७५ वर्ष पुर्ण होत आहेत. आजची परिस्थिती पाहिली असता,
दुर्दैवाने दुतर्फा असलेले प्लास्टर पुर्णपणे पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहुन गेल्याने मातीचे भराव ही ठिसूळ होऊन
अनेक ठिकाणी तेही वाहुन गेल्याने ते कुठल्याही ठिकाणी कुठल्याही क्षणी कालवा फुटीला आमंत्रण देऊ शकतात.
. धरण बांधल्यानंतर धरण व्यवस्थापनात अनेक गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी फक्त एजंटांच्या नेमणुका करुन
स्वत:ची वरकमाई करुन घेतली. पण शासनदरबारी कालवे दुरूस्तीचे प्रस्ताव पाठवून त्याचा पाठपुरावा करुन
भरघोस निधी आणुन कालवा दुरुस्तीचे काम गतीने केले आहे, असे एकही उदाहरण ऐकीवात नाही. वाईतील एका
बलाढ्य कंपनीने गेल्या कित्येक वर्षांपासून करोडो रुपयांचे कालव्यातील पाणी चोरले, त्यावर कारवाई करण्यासाठी
सातारा येथील कार्यकारी अभियंत्यांकडे प्रस्ताव पाठवला, आज सहा महिने उलटले, तरी कुठल्याही प्रकारची
दंडात्मक कारवाई अथवा फौजदारी गुन्हा दाखल केला नाही.