




शालेय उपक्रमात सर्वोत्तम काम असलेल्या जिल्ह्यांना मिळणार ५, ३ व २ कोटींची पारितोषिके
– शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची घोषणा
पुणे, दि. १९ (जिमाका वृत्तसेवा) : राज्यातील गुणवत्तापूर्ण व नाविन्यपूर्ण शिक्षण उपक्रमांना चालना देण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषद व महानगरपालिकांना अनुक्रमे प्रथम क्रमांकास ५ कोटी, द्वितीय क्रमांकास ३ कोटी आणि तृतीय क्रमांकास २ कोटी रुपयांची प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात येतील, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे यांनी आज पुण्यात केली.
बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड येथे आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय शालेय शिक्षण परिषदेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
या उद्घाटन सोहळ्यास शालेय विभागाचे प्रधान सचिव श्री. रनजीत सिंह देओल, शिक्षण विभागाचे आयुक्त श्री. सचिन्द्र प्रताप सिंह, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबईचे राज्य प्रकल्प संचालक श्री. संजय यादव, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक श्री. राहुल रेखावार, राज्य परीक्षा परिषदेचे संचालक श्री. नंदकुमार बेडसे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालनालय (योजना) पुणेचे संचालक श्री. कृष्णकुमार पाटील, बालभारती पाठ्यपुस्तक मंडळाच्या संचालक सौ. अनुराधा ओक, सीईओ अँड हेड ऑफ परख सेल NCERT नवी दिल्लीच्या प्रा. इंद्राणी भादुरी, विविध जिल्ह्यांचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त, सहसंचालक, उपसंचालक, प्राचार्य डायट तसेच शिक्षण विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शालेय शिक्षण मंत्री श्री. भुसे म्हणाले की, “शिक्षण हे आनंददायी, गुणवत्तापूर्ण, भाकरीचे आणि राष्ट्रीयत्वाचे असले पाहिजे.” महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर यावा यासाठी शिक्षण विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व तंत्रज्ञानाचा वापर, पायाभूत सुविधा सुधारणा, प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना, शिष्यवृत्ती परीक्षा व निपुण भारत अभियान यावर त्यांनी भर दिला.
विद्यार्थ्यांच्या चौकसपणासाठी शैक्षणिक सहलींचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. ऐतिहासिक स्थळांना भेटी, शेतीतील कामांचे निरीक्षण, बँकेचे व्यवहार समजण्यासाठी सहली काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा, तसेच बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा घेण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
शालेय स्तरावरील १५ समित्यांचे रूपांतर चार समित्यांमध्ये करून अधिक प्रभावी कामकाज सुरू असल्याचे सांगून, पुढील शैक्षणिक वर्षापासून चौथी व सातवी इयत्तेसाठी शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा होणार असल्याची घोषणा त्यांनी केली. “विद्यार्थी हेच आपले दैवत असून शिक्षक हे शाळारूपी मंदिराचे पुजारी आहेत,” असे उद्गार काढून मंत्री महोदयांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले.
शालेय विभागाचे प्रधान सचिव श्री. रनजीत सिंह देओल यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांनी शिक्षण व आरोग्य या दोन क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करावे, तसेच शासन निर्णय तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी महापालिका आयुक्त व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यक्षमतेने पुढाकार घ्यावा, असे सांगितले.
प्रास्ताविक शिक्षण आयुक्त श्री. सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. त्यांनी शिक्षणाची गुणवत्ता, राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP), “निपुण भारत” लक्ष्य २०२७ तसेच शालेय स्तरावर सुरू असलेल्या उपक्रमांवर सविस्तर माहिती दिली.
उद्घाटन सोहळ्यात शालेय शिक्षण मंत्री श्री. दादाजी भुसे यांच्या हस्ते शिक्षक व अधिकारी-कर्मचारी स्पर्धा मार्गदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यात ४२ स्पर्धांपैकी ३६ स्पर्धा व ६ ऑलिम्पियाडचा समावेश असून, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक श्री. राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली ही मार्गदर्शिका तयार करण्यात आली आहे.