खंडेरायाच्या साक्षीने जेजुरी येथे वाघ्या-मुरळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे यांच्या हस्ते चित्रपटाचे पोस्टर लाँच!!
अभिषेक जावीर दिग्दर्शित “फुला” १७ एप्रिलपासून चित्रपटगृहात!!
Murali’s story of struggle will unfold in ‘Phula’!!


अस्सल मराठी मातीतल्या वाघ्या-मुरळीची संघर्षमय कथा आगामी ‘फुला’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटाचं पोस्टर खंडेरायाच्या साक्षीने जेजुरी येथे वाघ्या-मुरळी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मार्तंड साठे यांच्या हस्ते लाँच करण्यात आले याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते , दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थितीत होती. हा चित्रपट येत्या १७ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे
पै. अजित शिवाजी जाधव यांनी “फुला” या चित्रपटाची निर्मिती केली असून शिवशर्विल मूव्ही आणि बोधी सिनेमा यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे.अभिषेक जावीर दिग्दर्शित या चित्रपटाची पटकथा रवीकिरण जावीर यांनी लिहिली आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक असलेल्या समाधान ऐवळे यांनी या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. अमर देवकर यांनी सर्जनशीर दिग्दर्शन, रवीकिरण जावीर, समाधान ऐवळे यांनी गीतलेखन, प्रताप जोशी यांनी छायांकन, अतुल लोखंडे यांनी कला दिग्दर्शन, राहुल प्रजापती यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. वेशभूषा कोमल जावीर, अक्षता पाटील तर रंगभूषा समाधान भोरे यांची आहे. गायिका वैशाली सामंत, वैशाली माडे, गायक रोहित राऊत, रवींद्र खोमणे, वैशाली इंगवले, वैष्णवी अदोडे, आकाश नवगिरे यांनी चित्रपटातील गाण्यांना आवाज दिला आहे. प्रियांतिका, आरोही गडदे, मंजुषा खेत्री, संतोष शिंदे, देवा गाडेकर, रविकिरण जावीर, सनी कदम, छाया आदट, शरद लांडगे या नव्या दमाच्या कलाकारांचा उत्तम अभिनय आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण आणि टीम ही आटपाडी गावातील असून त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.
“फुला” ही एका मुरळीच्या पोटी जन्मलेल्या निरागस मुलीची संघर्षमय कथा आहे. तमाशा फड, जागरण गोंधळ या पारंपरिक सांस्कृतिक पटावर आधारित ही गोष्ट महाराष्ट्राच्या लोकपरंपरेतून आकार घेते. चित्रपटाविषयी दिग्दर्शक अभिषेक जावीर म्हणाले, “फुला” हा चित्रपट म्हणजे केवळ एका मुलीची शोकांतिका नाही, तर तो महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांमध्ये अ़डकलेल्या स्त्री कलाकारांच्या अस्तित्त्वाचा जीवंत दस्तावेज आहे. मुरळी परंपरेत अनेक स्त्रियांना कधीही त्यांची स्वप्नं, हक्क, प्रेम, सन्मानाने जगण्याची संधी मिळत नाही. समाज त्यांची कला घेतो, पण त्यांना माणूस म्हणून जगू देत नाही. वास्तवाचं प्रामाणिकपणे चित्रण करण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे केला आहे.