Three temples in Daund taluka will be given ‘B’ class status

- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
मुंबई, दि. २६ : दौंड तालुक्यातील श्री शंभो महादेव मंदिर देवस्थान, राहू व श्री भानोबा मंदिर देवस्थान कुसेगाव आणि नारायण महाराज देवस्थान या तीनही देवस्थानांना ब वर्ग दर्जा देण्यात येईल. तसेच या तीनही देवस्थांनाना प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
दौंड तालुक्यातील श्री शंभो महादेव मंदिर देवस्थान, राहू व श्री. भानोबा मंदिर देवस्थान कुसेगाव यांना ‘ब’ वर्ग दर्जा मिळणेबाबत विधानसभा सदस्य राहूल कुल यांनी उपस्थित केलेल्या अर्धातास चर्चेला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे बोलत होते.
श्री. गोरे म्हणाले की, राज्यातील प्रमुख यात्रास्थळांच्या पायाभूत सुविधांच्या मजबुतीकरणासाठी शासन कटिबद्ध असून पात्र देवस्थानांना ‘ब’ व ‘क’ वर्गाचा दर्जा देण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यात येईल. १२ ऑक्टोबर २०११ रोजीच्या शासन निर्णयानुसार ज्या यात्रास्थळांवर भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते, अशा ठिकाणांना ‘ब’ वर्ग देवस्थानाचा दर्जा देऊन पायाभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात्रास्थळांच्या विकासासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात अकरा यात्रास्थळांच्या मजबुतीकरणासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे.
दौंड तालुक्यातील राहू येथील श्री शंभो देवस्थान, पुसेगाव येथील भानोबा देवस्थान आणि मौजे नारायण (ता. दौंड) येथील नारायण महाराज देवस्थान या यात्रास्थळांच्या विकासासाठी प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून मागविण्यात आले आहेत. भाविकांची संख्या दर्शविणारा अधिकृत दाखला याबाबत तातडीने पाठपुरावा करून आवश्यक दाखले सादर करण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत. पात्रता निकष पूर्ण झाल्यानंतर तिन्ही देवस्थानांना तातडीने ‘ब’ वर्ग दर्जा देण्यात येईल आणि प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून विकासकामे हाती घेतली जातील, असे मंत्री गोरे यांनी सांगितले.
याशिवाय पद्मावती देवस्थान तसेच विठ्ठल व राजेश्वरी देवस्थान ही सध्या ‘क’ वर्गात आहेत. या तिन्ही देवस्थानांना उच्च दर्जा देण्यासंदर्भातही जिल्हा परिषदेला प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात येतील. निकष पूर्ण झाल्यास त्यांनाही दर्जा वाढवून विकासासाठी निधी देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील प्रत्येक मोठे यात्रास्थळ पायाभूत सुविधांनी सक्षम व्हावे, भाविकांना स्वच्छता, पाणी, रस्ते, निवास या सोयी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शासन काम करत आहे. केवळ दर्जा देऊन न थांबता त्या-त्या देवस्थानांचा प्रत्यक्ष विकास साधण्याची भूमिका शासनाने घेतली आहे.