जमिनीच्या वादातून थरार! भवरापुर येथे कारने दुचाकीला धडक देत तरुणाची निर्घृण हत्या; दोन जण अटक

Photo of author

By Sandhya

Thrilling incident over land dispute! A young man was brutally murdered after a car hit his bike in Bhawarapur; Two people arrested

उरुळी कांचन प्रतिनिधी : भवरापूर (ता. हवेली) येथे जुन्या जमिनीच्या वादातून एका तरुणाची कारने जाणीवपूर्वक धडक देऊन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवार (दि. २ मार्च) रोजी दुपारी पावणेचार च्या सुमारास घडली. या प्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात १)अक्षय दशरथ साठे (वय ३२ वर्ष) रा. भवरापूर,ता. हवेली,२) गोकुळ नाना कोकरे (वय २३ वर्ष) रा.आष्टापूर, ता.हवेली, जि. पुणे यांना अटक करण्यात आली आहे. अक्षय साठे याच्यावर यापूर्वीही लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

तक्रारदार लक्ष्मण सोपान साठे (वय ५८, व्यवसाय, शेती) रा. भवरापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जमीन गट क्रमांक १०४ संदर्भातील जुना वाद तसेच सामाईक नदीवरील मोटार दुरुस्तीच्या कारणावरून आरोपींमध्ये वाद सुरू होता. या वादाचा राग मनात धरून आरोपी अक्षय साठे व त्याचा साथीदार गोकुळ कोकरे यांनी संगनमताने पूर्ववैमनस्यातून लक्ष्मण साठे यांचा मुलगा महेश लक्ष्मण साठे (वय ३२ वर्ष) याचा जीव घेतल्याचा आरोप केला आहे.

सोमवर दि.२ मार्च रोजी सुमारे ३:४५ वाजता महेश साठे हे झालेल्या वादाची तक्रार देण्यासाठी उरुळी कांचन पोलीस स्टेशनला गेले होते. त्यावेळी पोलीसांनी महेश साठे ला वैद्यकीय तपासणी साठी पाठवले. त्यावेळी आधार कार्ड नसल्याने ते आणण्यासाठी मोटरसायकल (क्र. MH12CJ9551) यावरून उरुळी कांचन ते भवरापूर मार्गे जात असताना, आरोपींनी त्यांच्या हुंडाई कंपनीची आय-ट्वेंटी (क्र. MH12QY7888) या कारने मागून जोरदार धडक दिली. ही धडक जाणीवपूर्वक देत खून केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेपूर्वी महेश साठे यांच्या पत्नीने दुपारी ०३:२० वाजता (११२) या पोलीस मदत क्रमांकावर फोन करून “आमच्या घरी लोक मारायला येणार आहेत,तसेच माझ्या पतीच्या जीवाला धोका आहे. आपण तातडीने या,” अशी माहिती दिली होती. त्यानंतर पो हवा दत्तात्रय गाडेकर व पो कॉ सुमित वाघ हे तात्काळ भवरापूरकडे रवाना झाले.

सुमारे ३:४५ वाजता साठे वस्ती येथे पोहोचल्यावर पोलिसांना दुचाकी व कारचा अपघात झाल्याचे आढळले. महेश साठे हे रस्त्याच्या कडेला गंभीर जखमी अवस्थेत पडलेले होते. पोलिसांनी तातडीने त्यांना उपचारासाठी रवाना केले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते.घटनेनंतर कारमधील एक जण पळून गेला. तर कार चालक अक्षय साठे याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. पुढील तपासादरम्यान पळुन गेलेला आरोपी गोकुळ कोकरे ला पोलीसांनी अटक केली आहे. या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांबळे करीत आहेत.

या घटनेमुळे भवरापूर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. जमिनीच्या वादातून थेट जीव घेण्यापर्यंत गेलेली ही घटना तालुक्यात खळबळ उडवणारी ठरली आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page