


पुरंदर मधील बेलसर येथेभीषण दुर्घटना; दूषित पाण्याच्या टाकीत गुदमरून तिघांचा मृत्यू तिघे मयत उत्तर प्रदेशातील कामगार.
जेजुरी वार्ताहर 26 पुरंदर तालुक्यातील बेलसर जवळील चोपण वस्ती परिसरातील एका मशरूम तयार करण्यात कंपनीत हृदयद्रावक दुर्घटना घडली. दूषित पाण्याच्या टाकीची साफसफाई करताना विषारी वायूचा फटका बसून तसेच पाण्याच्या टाकीत बुडून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेत पिंटू राजेश प्रसाद वय 23 रा खोराराम उत्तर प्रदेश,व्यास सोहन कुमार वय 22 रा नवंतम,उत्तर प्रदेश,आणि गौतम यमसुख कुशवाह वय 36 रा मेदणपुर उत्तर प्रदेश यांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बेलसर जवळील चोपण वस्ती येथे वाडा ऍग्रो मशरूम कंपनी आहे. या कंपनीत 35 कामगार करीत आहेत. मशरूम तयार करण्यासाठी गव्हाचा भुसा वापरला जातो. या भूषावर पाणी मारले जाते.उर्वरित पाणी एका टाकीत जमा होते.दहा ते पंधरा दिवसांनी या टाकीची स्वच्छता केली जाते.
रविवार दिनांक 26 रोजी दुपारी साडे तीन वाजता पिंटू प्रसाद हा कामगार ही टाकी स्वच्छ करण्यासाठी कंपनी परिसरातील सुमारे ५ बाय ५ फूट आकाराच्या टाकीत उतरला. मात्र टाकीमध्ये साचलेल्या विषारी वायूमुळे काही क्षणांतच त्याचा श्वास गुदमरू लागला. त्याला वाचवण्यासाठी दुसरा कामगार व्यास कुमार तत्काळ टाकीत उतरला, पण दुर्दैवाने त्याचाही श्वास गुदमरला.
दोघांना बाहेर काढण्यासाठी ठेकेदार गौतम कुशवाह स्वतः टाकीत उतरला. मात्र टाकीतील घातक वायूचा फटका त्यालाही बसला आणि काही क्षणांतच तिघेही बेशुद्ध पडले. व पाण्याच्या टाकीत बुडाले, जेसीबी च्या साहाय्याने ही पाण्याची टाकी फोडून तिघांना बाहेर काढण्यात आले. व तातडीने जेजुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच या तिघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.अशी फिर्याद कंपनीचे ग्रॉअर प्रदीप गोटे यांनी दिली.
घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या . या प्रकरणी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे तपास करीत आहेत.