Jejuri’s ‘Bhandara’ now within the legal framework; Food and Drug Administration Minister Narhari Jirwal’s decision for the health of devotees

Photo of author

By Sandhya

जेजुरीचा ‘भंडारा’ आता कायद्याच्या चौकटीत; भाविकांच्या आरोग्यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा निर्णय

मुंबई,दि. १४ : जेजुरी गडकोटातील भक्तांचे श्रद्धास्थान असलेला आणि भंडाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेला ‘हळद भंडारा’ आता कायदेशीर चौकटीत येणार आहे. अन्न व औषध प्रशासन लवकरच जेजुरीतील भंडाऱ्यासाठी विशेष धोरण निश्चित करणार आहे, जे पारदर्शकता आणि शुद्धतेला प्राधान्य देईल. भाविकांच्या आरोग्यासाठी या संदर्भात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी निर्देश दिले आहेत.
जेजुरी गडकोटावर भंडारा उधळून आग लागल्याची घटना काही काळापूर्वी घडली होती. लोकप्रतिनिधींनी या घटनेबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर भंडाऱ्याच्या सुरक्षिततेसाठी आणि पारदर्शकतेसाठी विशेष धोरण ठरविण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत आमदार विक्रम पाचपुते, आमदार महेश शिंदे, आमदार राजू नवघरे, तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव धीरजकुमार, आयुक्त श्रीधर डुबे पाटील आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
विविध देवस्थानांच्या ठिकाणी विकला जाणारा ‘हळद भंडारा’ शुद्ध हळदीच्या स्वरूपातच उपलब्ध असावा, तसेच विक्रेत्यांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ नुसार अन्न परवाना घेऊनच विक्री करावी, असे स्पष्ट निर्देश स्थानिक प्रशासनाला दिले जात आहेत. यामुळे भेसळयुक्त ‘हळद भंडारा’ विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे शक्य होणार आहे.
मंत्री नरहरी झिरवाळ यांनी प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून, त्याच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी नगरपरिषद आणि आरोग्य विभागाने खालील उपाययोजना करण्याचे ठरवले आहे:
सुरक्षितता उपाययोजना: मंदिर परिसरात भंडाऱ्याच्या वापराबाबत सुरक्षिततेचे नियम लागू करणे.
जनजागृती: भाविकांना शुद्ध भंडाऱ्याची ओळख व्हावी यासाठी ठिकठिकाणी माहितीफलक लावणे.
आरोग्य मोहीम: आरोग्य विभागाद्वारे भंडाऱ्याच्या वापराबाबत आणि गुणवत्तेबाबत विशेष तपासणी मोहीम राबविणे.
कायदेशीर दृष्टिकोनातून भंडाऱ्याचे वर्गीकरण महत्त्वाचे ठरणार आहे. सामान्यतः ‘ भंडारा’’ म्हणजे मोफत अन्न वितरण, परंतु जेजुरीत तो ‘हळद भंडारा’ या स्वरूपात पूजेसाठी वापरला जातो. जर हळदीचा वापर सौंदर्यवाढ किंवा उपचारासाठी केला जात असेल, तर तो औषध किंवा सौंदर्यप्रसाधन यामध्ये येतो, परंतु जेजुरीतला हळद भंडारा’ ‘धार्मिक विधी’ आणि ‘प्रसाद’ म्हणून वापरला जातो. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन त्याचे विशेष नियमन करणार आहे.
मंत्री नरहरी झिरवाळ यांनी म्हटले, “जेजुरी हे महाराष्ट्राचे सुवर्ण मंदिर आहे. येथील भंडाऱ्याची शुद्धता राखणे ही आमची जबाबदारी आहे. भाविकांच्या श्रद्धेचा सन्मान राखत त्यांना सुरक्षित आणि शुद्ध हळद भंडारा मिळावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
या निर्णयामुळे जेजुरीतील भंडाऱ्याला कायदेशीर ओळख मिळणार असून, देवस्थानांच्या ठिकाणी भेसळ रोखण्यासाठी हा एक ऐतिहासिक पाऊल मानले जात आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page