

समाज जीवनातील वास्तव पुस्तकरूपात शब्दबद्द करण्याची गरज : फ.मु.शिंदे
राज्यस्तरीय दोन दिवसीय भीमथडी मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
“समाज जीवनातील घडामोडी शब्दात पकडून पुस्तक रूपाने प्रसिद्ध होतात. तेच सत्य वास्तव हा खरा इतिहास असतो असे समाज घडविणारे सृजनशील साहित्य लिहिणाऱ्या लेखकांची खरी गरज आहे.” असे प्रतिपादन संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक प्रा. फ. मुं. शिंदे यांनी केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या वतीने राज्यस्तरीय पाचवे भीमथडी मराठी साहित्य संमेलनाचे दि.२३ व दि.२४ मे २०२६ रोजी दोन दिवसीय आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी श्री शिंदे बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर, स्वागताध्यक्ष डॉ.रोहन खवटे, निमंत्रक डॉ.भरत खळदकर व सहनिमंत्रक रामचंद्र नातू, मराठी चित्रपट सैराट फेम अभिनेता सुरज पवार, अभिनेत्री कोमल शिंपी, संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, पुणे जिल्हा वारकरी सेवा संघ समन्व्यक ह.भ.प संजय वाबळे, विनोद जगताप, कैलास शेलार, डॉ.अशोक जाधव, प्रमोद ढमाले, संभाजी फडके, एकनाथ अडसूळ, भाऊसाहेब फडके, तानाजी केकाण, अरुण यादव, बाळुतात्या यादव, चंद्रकांत बोरावके आदी उपस्थित होते.
भीमथडी मराठी साहित्य संमेलनाची सुरवात श्री बोरमलनाथ महाराजांना भीमेच्या पाण्याचा जलाभिषेक व ग्रंथदिंडी काढून करण्यात आली. ग्रंथदिंडीत कवी, लेखकांनी, साहित्यिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, लोकरंग व सांस्कृतिक कार्यक्रम, कविसंमेलन आणि समारोप असे भरगच्च कार्यक्रमाने साहित्य संमेलन रंगले.
श्री जानकर म्हणाले, “ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव व त्यांचे सहकारी हे अनेक अडचणी सहन करीत या साहित्य मेळाव्याचे आयोजन करतात. कोणतेही शासकीय अनुदान नसल्याने त्यांची ताऱेवरची कसरत होते. नवोदित कवी, लेखक, साहित्यिक, कलावंत त्यांना हे खुले व्यासपीठ उपलब्ध करून देत आहेत. आम्ही सत्तेत असू की नसो, आम्ही नेहमी पाठीशी उभे राहून आपणास सहकार्य करू आणि या साहित्य चळवळीस पाठबळ देऊ.”
दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल म्हणाले, “दौंड तालुका हा नेहमी विकासकामात आघाडीवर आहे. भीमथडी मराठी साहित्य संमेलन ही साहित्य चळवळ अतिशय महत्वाची भूमिका बजावत आहे. साहित्य व सांस्कृतिकदृष्ट्या तालुका सक्षम करण्यासाठी भीमथडी मराठी साहित्य संमेलन महत्वाची भूमिका बजावत आहे. त्यांना कायम मदत करू.”
ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव म्हणाले, “साहित्य व मराठी संस्कृती मजबूत झाल्याशिवाय समाज हा सक्षम होणार नाही त्यासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट मराठी साहित्य भवन हे दौंड तालुक्यातील चौफुला या ठिकाणी पाच एकरात भव्य दिव्य स्वरूपात साकरण्यात येणार आहे. यामध्ये लोकसहभागातून व शासकीय मदतीने हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करणार आहोत. ज्येष्ठ साहित्यिक, कलावंत यांना दरमहा पाच हजार रुपये मानधन मिळवण्यासाठी पाठपुरावा करू, मराठी साहित्य भवनात भव्य सांस्कृतिक सभागृह, सांस्कृतिक उद्यान, साहित्यिकांसाठी आश्रम, ग्रंथालय, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका असे विविध उपक्रम या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत.”
साहित्य संमेलनाची सुरुवात श्री बोरमलनाथ देवाला भीमेच्या पाण्याचा जलाभिषेक ह भ प संजय वाबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी महादेव जानकर, अरुण यादव, माजी न्यायाधीश वसंत पाटील उपस्थित होते.
यावेळी भीमाथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे, बाळासाहेब मुळीक, दत्तात्रय डाडर, सुशांत जगताप, अरविंद जगताप, राजाभाऊ जगताप, रवींद्र खोरकर, संदिप सोनवणे, विठ्ठल थोरात, आनंदा बारवकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप रासकर यांनी केले.आभार भीमाथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे सचिव दिपक पवार यांनी मानले.