The government is committed to the health, safety, and holistic development of students, alongside their education!

Photo of author

By Sandhya

  • School Education Minister Dadaji Bhuse

शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध!
-शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

तोरणमाळच्या दुर्गम डोंगररांगांतून शैक्षणिक वर्ष 2026-27 चा उत्साहात शुभारंभ, विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

नंदुरबार, दिनांक 15 जून 2026 (जिमाका):
“शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. प्रत्येक विद्यार्थी सक्षम, सुसंस्कृत आणि राष्ट्रभक्त नागरिक घडला पाहिजे. शिक्षण हाच दऱ्याखोऱ्यांतील आदिवासी बांधवांच्या प्रगतीचा सर्वात प्रभावी मार्ग आहे,” असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या शुभारंभानिमित्त आणि प्रवेशोत्सव-आनंदोत्सव कार्यक्रमानिमित्त नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील दुर्गम तोरणमाळ येथील नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत करताना ते बोलत होते. यावेळी आमदार आमश्या पाडवी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद मुंबईच्या उपसंचालक भावना राजनूर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भानुदास रोकडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वंदना वळवी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट)चे प्राचार्य डॉ. दीपक साबळे, रमेश चौधरी, माजी शिक्षण सभापती गणेश पराडके, सीताराम पावरा, राकेश पावरा, जीवन रावतळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेच्या पहिल्या दिवशी राज्यभरात प्रवेशोत्सव आणि आनंदोत्सवाच्या माध्यमातून नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येत असल्याचे सांगत मंत्री श्री. भुसे यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. दुर्गम आणि आदिवासीबहुल भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाचा आनंद पोहोचावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. तोरणमाळ येथील आवासीय विद्यालयाचा विशेष उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, 20 शाळांचे एकत्रीकरण करून उभारण्यात आलेले हे शिक्षणकेंद्र दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे. प्रतिकूल परिस्थितीतही येथे ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरू असून, दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळत आहे. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी स्वतःच्या जुळ्या मुलांना शासकीय शाळेत प्रवेश देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केल्याचे सांगत शिक्षणमंत्र्यांनी त्यांच्या या निर्णयाचे विशेष कौतुक केले. शासनाच्या शाळांबाबत समाजामध्ये विश्वास निर्माण करणारे हे प्रेरणादायी उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या सोयी-सुविधांबाबत बोलताना श्री. भुसे यांनी आवासीय विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी बेड, शुद्ध पिण्याचे पाणी, सौरऊर्जा यंत्रणा आणि स्वच्छतागृहांच्या सुविधा येत्या सहा महिन्यांत उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याची नियमित काळजी घेण्यासाठी दरमहा आरोग्य तपासणी करण्यात येईल आणि शाळेसाठी रुग्णवाहिकेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘राणी लक्ष्मीबाई स्वसंरक्षण प्रशिक्षण’, सैनिक शिक्षण, योगासने आणि विविध व्यक्तिमत्त्व विकास उपक्रम राबविले जात असल्याची माहिती देत त्यांनी क्रीडा क्षेत्रातील संधी वाढविण्यावर शासनाचा विशेष भर असल्याचे स्पष्ट केले. प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्याचा शासनाचा मानस असून, तोरणमाळ येथे क्रीडा अकादमी उभारण्याचाही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात काळाची गरज ओळखून सकारात्मक बदल करण्यात आले असून, महान क्रांतिकारक, समाजसुधारक आणि राष्ट्राच्या मानबिंदूंचा इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करून त्यांना अध्यापनासाठी अधिक वेळ उपलब्ध करून दिल्याचेही त्यांनी सांगितले. पालकांनी आपल्या पाल्यांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन करताना श्री. भुसे म्हणाले की, विद्यार्थ्यांची स्वच्छता, शिस्त आणि नियमित उपस्थिती यासाठी पालक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समिती यांचे संयुक्त प्रयत्न आवश्यक आहेत. स्थानिक बँका, उद्योगसंस्था आणि माजी विद्यार्थी संघटनांच्या सहकार्याने या ज्ञानमंदिराचा अधिक विकास साधला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

अतिदुर्गम धडगाव-अक्कलकुवा भागात शिक्षणासह क्रीडा व पर्यटनाची नवी पहाट: आमश्या पाडवी

राज्याचे शिक्षणमंत्री पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या भेटीचा उपयोग करत आमदार आमश्या पाडवी यांनी या अतिदुर्गम भागाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध मागण्यांचा आणि आवश्यक बाबींचा आढावा मांडला. धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यातील 29 शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर भर देतानाच, त्यांनी या भागातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी क्रीडा व पर्यटन विकासाचे महत्त्व अधोरेखित केले.

याबाबत बोलताना आमदार आमश्या पाडवी म्हणाले की, “राज्याचे शिक्षणमंत्री पहिल्यांदाच आमच्या या अतिदुर्गम भागात आल्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये मोठा उत्साह आहे. आमच्या भागातील आदिवासी मुले प्रतिकूल परिस्थितीतही खेळांच्या मैदानात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर धडाडीने चमकत आहेत. त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, यासाठी येथे अद्ययावत क्रीडा संकुल उभारणे अत्यंत गरजेचे आहे. हे ठिकाण थंड हवेचे असल्याने ते खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी अतिशय पूरक ठरेल आणि भविष्यात हे एक आदर्श क्रीडा केंद्र म्हणून विकसित होईल. शिक्षणासोबतच, येथील महादेव मंदिर आणि यशवंत तलाव परिसराच्या पर्यटन विकासातून स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणे शक्य आहे. शिक्षणमंत्र्यांनी या भागाकडे विशेष लक्ष दिल्याने, केवळ विद्यार्थ्यांचे भविष्यच नव्हे, तर या संपूर्ण आदिवासी क्षेत्राचे नशीब पालटून त्यांना स्वावलंबी बनवण्याचा आमचा मानस आहे. मला खात्री आहे की, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यापासून ते क्रीडा व पर्यटनापर्यंतच्या आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक पुढाकार घेईल.”

आमदार पाडवी यांनी मांडलेली ही विकासाची दूरदृष्टी केवळ शिक्षण क्षेत्रापुरती मर्यादित नसून, ती आदिवासी समाजाच्या आर्थिक व सामाजिक उत्थानासाठी एक आश्वासक दिशा देणारी ठरत आहे. या भेटीमुळे दुर्गम भागातील विकासाच्या अपेक्षांना नवी पालवी फुटली असून, शासनाकडून ठोस मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

‘टॉप-नॉच’ शिक्षण देण्यावर आमचा भर : डॉ. मित्ताली सेठी

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी प्रशासनाच्या कटिबद्धतेचा व ‘टॉप-नॉच’ शिक्षण देण्यावर भर असल्याचा पुनरुच्चार केला. त्यांनी सांगितले की, शिक्षण मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन या भागातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष सर्वेक्षण करत आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक मुलाच्या गरजा समजून घेऊन, त्यांना योग्य त्या सोयीसुविधा पुरवण्याचा आमचा मानस आहे.

डॉ. सेठी यांनी तोरणमाळ येथील इंटरनॅशनल स्कूलचा दर्जा उंचावण्यावर भर देत स्पष्ट केले की, येथील विद्यार्थ्यांना केवळ पारंपारिक शिक्षण न देता, विज्ञान, तंत्रज्ञान आणि साक्षरतेवर आधारित ‘टॉप-नॉच’ शिक्षण देण्यावर आमचा भर आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळेत क्रीडा अकॅडमी, अत्याधुनिक स्पोर्ट्स ट्रॅक, विज्ञान प्रयोगशाळा आणि ‘मेकर्स लॅब’ यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच, आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे विशेष महत्त्व लक्षात घेता त्यांना योग्य मार्गदर्शन पुरवण्यात येणार आहे.

या शैक्षणिक उपक्रमात संगीत आणि इतर अभ्यासेतर उपक्रमांचा समावेश करून शाळेचे वातावरण अधिक चैतन्यमय करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शाळेतील उत्तम पायाभूत सुविधा आणि तज्ज्ञ शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांमध्ये ‘पिअर लर्निंग’ (सहकाऱ्यांकडून शिकणे) वाढवण्यावर आम्ही भर देत आहोत. आपल्या भाषणाच्या शेवटी, डॉ. सेठी यांनी नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थी आणि पालकांना शुभेच्छा दिल्या आणि तोरणमाळच्या या शैक्षणिक प्रवासाला एका नवीन उंचीवर नेण्यासाठी सर्वांच्या सहकार्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, शैक्षणिक साहित्य आणि शुभेच्छांच्या माध्यमातून उत्साहात स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी दुर्गम तोरणमाळमध्ये पोहोचून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणाऱ्या या उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page