Government committed to bringing rural students into the mainstream of modern education – Deputy Chief Minister Sunetra Ajit Pawar

Photo of author

By Sandhya

ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

स्पर्धा, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही मागे राहू नयेत, यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार, आधुनिक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

नवीन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी मावळ तालुक्यातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कान्हे येथे आयोजित ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६-२७’ कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी आमदार सुनील शेळके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा परिषद सदस्य दिपाली हुलावळे, सुनीता येवले, शिक्षण विभागाचे उपसंचालक गणपतराव मोरे, शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड, गणेश ढोरे, विठ्ठल शिंदे, गणेश खांडगे, साहेबराव कारके यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, विद्यार्थ्यांना आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे तसेच प्रत्येक शाळेत आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामीण विद्यार्थ्यांनाही शहरी भागातील विद्यार्थ्यांप्रमाणे समान संधी मिळणे आवश्यक आहे. यासाठी डिजिटल क्लासरूम, आधुनिक शैक्षणिक साधने आणि गुणवत्तापूर्ण पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अभ्यासाबरोबरच क्रीडा, कला आणि कौशल्यविकासालाही प्रोत्साहन दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार सुनील शेळके यांनी मावळ तालुक्यात शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. जिल्हा परिषद शाळांमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा आणि संशोधन क्षेत्रातही प्रगती साधून मोठी स्वप्ने पूर्ण करावीत, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. जिल्हा परिषद शाळांचे रूपांतर आधुनिक, डिजिटल आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षण संस्थांमध्ये करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षक, पालक आणि प्रशासन यांच्यातील समन्वय महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली ती याच शाळेतील गुणवंत विद्यार्थिनी कु. रुद्रा गणेश राजगुरे. चाचणी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून ‘नासा’सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेला भेट देण्याची संधी मिळविल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते तिचा विशेष सत्कार करण्यात आला. तिच्या यशाबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील ३०३ केंद्रप्रमुखांना देण्यात येणाऱ्या टॅबपैकी प्रातिनिधिक स्वरूपात चार केंद्रप्रमुखांना मान्यवरांच्या हस्ते टॅब प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शाळेत प्रथमच प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून, फुलांचा वर्षाव करत आणि गुलाबजाम भरवत उत्साहात स्वागत केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करणे, शाळेविषयी आपुलकी वाढविणे आणि आनंददायी वातावरणात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करणे हा शाळा प्रवेशोत्सवाचा उद्देश असून उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Comment

You cannot copy content of this page