पुढील चार दिवस पावसाच्या हजेरीची शक्यता

Photo of author

By Sandhya

पुढील चार दिवस पावसाच्या हजेरीची शक्यता

भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात 29 एप्रिल ते 2 मे या कालावधीमध्ये विजेच्या कडकडाटासह वादळी वारा, गारपीट व मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्‍यता वर्तविलेली आहे.

नागरीकांनी वादळी वारे, वीज, गारपीट आणि पाऊस यापासून स्वतःसह जनावरांचे संरक्षण होईल, याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.

मेघगर्जनेच्या वेळी विजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळा दरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्‍टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांच्यापासून दूर रहावे.

मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत / दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या / लोंबणाऱ्या केबल्सपासून दूर रहावे.

विजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. अवकाळी पाऊस व वादळी वारा व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी नियोजन करावे.

Leave a Comment