अजित पवार : ‘एक ट्रिलियन’चे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करू…

Photo of author

By Sandhya

अजित पवार

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत गाठण्याचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचा विश्वास उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना व्यक्त केला.

राज्याची आर्थिक स्थिती चांगली असून आर्थिक आव्हानांना तोंड देण्याची ताकद महाराष्ट्राकडे निश्चितपणे आहे. महसुली उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. आर्थिक शिस्त पाळताना अनावश्यक खर्च टाळण्यात येत आहे.

अशा उपाययोजना आणि कृतिकार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यापुढील आर्थिक आव्हानांवर यशस्वीपणे मात केली जाईल, असे सांगून विधानसभेत सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना उत्तर देताना अजित पवार म्हणाले, ‘‘राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी अंतरिम अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

संपूर्ण राज्यामधून भाविक कोल्हापूरमधील जोतिबा देवस्थानाला भेट देऊन दर्शन घेत असतात. येथील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जोतिबा देवस्थान प्राधिकरण स्थापन करण्यात येईल’’, अशी घोषणा पवार यांनी चर्चेला उत्तर देताना केली.

त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील पहिली समिती, पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील दुसरी समिती, उच्चाधिकार समिती आणि शिखर समितीच्या मान्यतेबाबतची कार्यवाहीदेखील गतीने करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात प्रतिदिन एक कोटी ६० लाख लिटर दूध संकलन होत असून त्यानुसार अनुदान योजनेसाठी २८३ कोटींची आवश्यकता आहे. यापैकी २०४ कोटींचा निधी पुरवणी मागणीद्वारे व उर्वरित निधी पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले असून दूध उत्पादक शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यात येणार आहे, असेही पवार यांनी सांगितले.

राज्य चालविणाऱ्यांनी नेहमीच मोठी स्वप्ने बघितली पाहिजेत आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सर्व ताकद लावली पाहिजे, असे सांगून पवार म्हणाले, ‘‘देशाच्या पंतप्रधानांनी २०४७ पर्यंत विकसित भारत बनविण्याचे आणि भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचा निर्धार केला आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मोठे योगदान राहणार असून इतर राज्यांपेक्षा आपले राज्य निश्चितपणे आघाडीवर असेल.

राज्याच्या स्थूल उत्पन्नात प्रतिवर्षी १० टक्के वाढ होत असून त्यात भरीव वाढ करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. याद्वारे राज्याने निश्चित केलेल्या कालावधीत राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्यात येणार असल्याचा पुनरुच्चारही पवार यांनी केला.

महत्त्वाच्या योजनांबद्दल माहिती देतांना उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, आशा स्वयंसेविका मानधन, निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ केली आहे. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत, शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा, नमो शेतकरी सन्मान निधी, गरीब-गरजूंना आनंदाचा शिधा अशा महत्वाकांक्षी योजनांसाठी निधीची तरतूद केली आहे.

पवार म्हणाले की, मुंबईतील इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम गतीने सुरु आहे. या क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यातील स्मारकासाठी कराव्या लागणाऱ्या भूसंपादन व इतर बाबींसाठी लागणाऱ्या खर्चासाठी पुरवणी मागण्यांद्वारे निधी देण्यात येईल.

Leave a Comment