आकाशदीपचा चौकार अन् बुमराहच्या साथीने फॉलोऑनचा धोका टळला

Photo of author

By Sandhya

मुंबई : आकाशदीपचा ’तो‌’ चौकार अन्‌ टीम इंडियावरील फॉलोऑनचा धोका टळला, राहुल-जडेजाने वाचवली लाज

एकीकडे भारतीय संघाचे टॉप ऑडर बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये संघर्ष करताना दिसत आहे, तर दुसरीकडे जसप्रीत बुमराह आणि आकाशदीप यांनी तुफानी फलंदाजी करत भारताला फॉलोऑनपासून वाचवले आहे. गाबा कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताची नववी विकेट रवींद्र जडेजाच्या रूपाने पडली. तेव्हा भारताची धावसंख्या 9 विकेटवर 213 धावा होती. फॉलोऑन वाचवण्यासाठी भारताला 33 धावांची गरज होती. यादरम्यान, विकेट पडली असती तर, ऑस्ट्रेलियन संघ भारताला पुन्हा फलंदाजीसाठी आमंत्रित करू शकला असता, पण जसप्रीत बुमराह आणि आकाशदीपने तसे होऊ दिले नाही.
आधी केएल राहुल आणि रवींद्र जडेजाच्या उत्कृष्ट अर्धशतकी खेळीनंतर बुमराह आणि आकाशदीप यांनी शेवटच्या विकेटसाठी 39 धावांची नाबाद भागीदारी करून टीम इंडियाला फॉलोऑनपासून वाचवले. टीम इंडियाला 13 वर्षांनंतर फॉलोऑनचा धोका होता. 2011 मध्ये इंग्लंडने भारतीय संघाला फॉलोऑन दिला होता, पण आकाशदीप आणि बुमराहने टीम इंडियाला 245 धावांपर्यंत नेऊन फॉलोऑन पुढे ढकलला होता.
चौथ्या दिवसाच्या शेवटच्या षटकात आकाशदीपने ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सवर चौकार मारताच संघाची धावसंख्या 245 धावांपर्यंत पोहोचली, तेव्हा भारतीय ड्रेसिंग रूममध्ये विराट कोहलीने जोरदार सेलिब्रेशन करायला सुरुवात केली. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर देखील खूप आनंदी दिसले आणि मोठ्याने टाळ्या वाजवल्या. यानंतर आकाशदीपनेही पॅट कमिन्सच्या चेंडूवर लांबलचक षटकार ठोकला आणि त्यानंतर विराट कोहलीचा आनंद पाहण्यासारखा होता.
भारतीय फलंदाज पुन्हा ठरले फेल
ॲडलेड कसोटीप्रमाणे गाबामध्येही भारतीय संघाची फलंदाजी सपशेल अपयशी ठरली. यशस्वी जैस्वाल 4, गिल 1, विराट कोहली 4, पंत 9 धावा करून आऊट झाला. तर कर्णधार रोहित शर्माला केवळ 10 धावा करता आल्या. नितीश रेड्डीही 16 धावांचे योगदान देऊ शकला.
राहुल-जडेजाने लाज वाचवली
केएल राहुल आणि रवींद्र जडेजानेच टीम इंडियाची लाज वाचवली. राहुलने शानदार फलंदाजी करत 139 चेंडूत 84 धावा केल्या. रवींद्र जडेजाने 123 चेंडूत 77 धावांची खेळी केली. या दोन फलंदाजांनी 115 चेंडूत 67 धावांची भागीदारी करून टीम इंडियाची धावसंख्या 200 च्या पुढे नेली.

Leave a Comment

You cannot copy content of this page