
नागपूर: नागपूरमध्ये दोन दिवसांपूर्वी उसळलेल्या हिंसाचारानंतर आता तणावपूर्ण शांतता आहे. या हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपावरून नागपूर पोलिसांनी जवळपास 50 हून आरोपींना अटक करून गुन्हे दाखल केले आहेत. तर, दुसरीकडे आता महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाची एन्ट्री झाली आहे. महाराष्ट्र एटीएसने नागपूर हिंसाचार प्रकरणाच्या तपासाची स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून हिंदू संघटनांकडून छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी तीव्र झाली आहे. सोमवारी सकाळी विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी पुतळ्याजवळ निदर्शने केली. या आंदोलनात मुस्लिम धर्मीयांसाठी पवित्र असलेल्या काही ओळी जाळण्यात आल्याचे चर्चा सगळीकडे पसरली. त्यानंतर दुपारी या आंदोलनाविरोधात मुस्लिम समुदायाकडून आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणल. मात्र, संध्याकाळी दोन्ही गट अचानक एकमेकांसमोर आले आणि दोन्ही बाजूने घोषणाबाजी झाली, दगडफेक झाली. शांत असणाऱ्या नागपुरात हिंसाचाराचा भडका उडाला. या भडक्यानंतर पोलिसांनी काही भागात संचार बंदी लागू केली आहे. तर, दुसरीकडे नागपूर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात झाली आहे.