
केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठीचा आढावा दौरा पुर्ण केला. या दौ–यात त्यांनी दिवाळीपूर्वी निवडणूका होणार असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, हरियानण आणि जम्मू–काश्मीवर विधानसभा निवडणूकीचा ८ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.
यानंतर १० ऑक्टोबरला या दोन्ही राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम संपेल. नियमानुसार एका निवडणुकीचा कार्यक्रम संपेपर्यंत दुसरी निवडणूक घोषित करता येत नाही. त्यामुळे राज्यात १३ ऑक्टोबरनंतर विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होईल आणि त्याच दिवशीपासून आचारसंहिता लागू होणार असल्याची दाट शक्यता आहे.
महाराष्ट्रात नवी विधानसभा २६ नोव्हेंबर २०२४ रोजी अस्तित्वात यायला हवी. तत्पूर्वी निवडणुकीसाठी मतदान होऊन निकाल लागणे आवश्यक आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर ४५ दिवसांनी नवीन विधानसभा गठीत करावी लागते. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मतदान घ्यायचे ठरवले तर त्यासाठी ऑक्टोबरला १३ ते १६ या तारखांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करावी लागेल.
त्यामुळे ४५ दिवसांनी राज्यात नवं सरकार येऊ शकते. अलीकडेच विधानसभा निवडणूक वेळेवर होण्याचे संकेत केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले. राज्य विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे, त्यापूर्वी निवडणूक होईल. विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्यावी, अशी मागणी शिंदे सेना आणि अजित पवार गटाने केली आहे.
मात्र, निवडणूक किती टप्प्यात होईल, हे लवकरच सांगू, असे राजीव कुमार यांनी सांगितले. दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणूकीची गेल्या काही महिन्यांपासूनच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यात सध्या सर्वच राजकीय पक्षांमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे.
यंदा सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या नाट्यमय राजकीय घटना आणि पक्षफुटीनंतर संपूर्ण राजकीय गणित बदलली आहे. यामुळे निवडणूकीतील विजयाबाबत दावे–प्रतिदावे केले जात आहेत.