दाढीवाल्या बाबांचा कार्यक्रम होईल ; नाना पटोलेंचा टोला

Photo of author

By Sandhya

शिवसेनेच्या (शिंदे गट) जाहिरातीवरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. यात एका सर्व्हेतून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून अधिक पसंती असल्याचा दावा करण्यात आला होता. यावरून विरोधी पक्षाने शिवसेनेवर टीका केली होती.

मात्र आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. दाढीवाल्या बाबांचा कार्यक्रम होईल असं दिसत असल्याचा टोला नाना पटोले यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.

कल्याणमध्ये काँग्रेसच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नाना पटोले बोलत होते. काय म्हणाले नाना पटोले?

“पहिली जाहिरात छापण्यात आली त्या जाहिरातीमध्ये दाढीवाले बाबा पुढे होते. त्यानंतर भाजप मंडळाची चलबिचल सुरू झाली आणि आठ दिवसामध्ये दुसरा सर्व्हेआला. त्यामध्ये तर आमचे नागपूरचे पुन्हा येईनवाले आले. मग दाढीवाल्यांचे 50 जे होते, त्या 50 मध्ये 15 निवडून येतील असे त्यांच्या सर्व्हेमध्ये दाखवण्यात आले.  म्हणजे दाढीवाल्या बाबांचा कार्यक्रम ठरलेला असल्याचे या जाहिरातीवरून स्पष्ट होते, ”

असे नाना पटोले यांनी मुख्यमंत्री शिंदेंना नाव न घेता टोला लगावला. “मंत्री दीपक केसरकर यांनी ‘साहेबांची बंडखोरी यशस्वी झाली नसती तर त्यांनी त्याचवेळी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेतली असती,’ असे वक्तव्य केले होते. त्यावर नाना पटोले म्हणाले की, हा कोणाचा लोभ आहे, तेच लोक लोभाचे उदाहरण देत आहेत.

बघा काय परिस्थिती असेल, पदाची लालसा किती असेल, राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी हे सरकार नाही. मी मुख्यमंत्री होऊ शकतो, यावर राजकारण करण्याची मानसिकता या लोकांची आहे,” अशी टीका त्यांनी शिंदे सरकारवर केली आहे.

ऑपरेशन लोटस दुसऱ्याचे घर बरबाद करत आहेत. महाराष्ट्राची जनता इतकी दुधखुळी नाही. लोकशाहीच्या विरोधातील हे भाजपचे काम आहे. परंतु महाराष्ट्राची जनता भाजपला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची एका वृत्तपत्रात मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये त्यांनी मुंबई ते सुरत आणि सूरत ते गुवाहाटी आमदारांचा प्रवास, ऑपरेशन लोटस संदर्भात काही खुलासे केले. रवींद्र चव्हाण यांच्या याच मुलाखतीवरून नाना पटोले यांनी ही टीका केली.

Leave a Comment