
पुण्यातील हिंजवडी परिसरात आयटी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला लागलेल्या आगीत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुरुवातीला हा अपघात शॉर्टसर्किटमुळे घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र तपासानंतर ही दुर्घटना नसून, चालकानेच घडवून आणलेला कट असल्याचा धक्कादायक खुलासा झाला. या प्रकरणी चालक जनार्दन हुंबर्डीकरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, जनार्दनच्या कुटुंबियांनी या आरोपांवर आक्षेप घेतला असून, तो निर्दोष असल्याचा दावा केला आहे. जनार्दनची पत्नी आणि भावाने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, “त्याचा जबाब तो शुद्धीत नसताना नोंदवण्यात आला, मग तो वैध कसा?” असा सवाल उपस्थित केला आहे.
“जनार्दनने असं कसं केलं असतं?” – कुटुंबियांचा प्रश्न
जनार्दनच्या कुटुंबियांनी असाही दावा केला आहे की, ज्या बसला आग लागली त्या बसमध्ये जनार्दनचे सख्खे भाऊजी देखील होते. “त्याच्या बहिणीचे पती त्या बसमध्ये असताना जनार्दन इतका मोठा धोका पत्करेल का?” असा सवाल कुटुंबियांनी केला आहे.
याशिवाय, कुटुंबियांनी आणखी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत:
ज्यांनी बसमधून जीव वाचवला, त्यांना किरकोळ जखमाही कशा नाहीत?
जनार्दनने जर पेट्रोल किंवा अन्य ज्वलनशील पदार्थ आणले असते, तर कंपनीत किंवा प्रवासादरम्यान कुणीच ते रोखलं नाही का?
कंपनीकडून आरोप फेटाळले
चालक जनार्दनने आपल्या जबाबात, कंपनीने आपल्याशी वाईट वागणूक दिली आणि दिवाळीचा पगार थकवल्यामुळे आपण संतापाच्या भरात हे कृत्य केल्याचा दावा केला होता. मात्र, व्युमा ग्राफिक्स कंपनीने हा दावा फेटाळून लावत, “जनार्दनचा कोणताही पगार बाकी नव्हता, त्याला वेळेवर वेतन देण्यात आलं होतं,” असे स्पष्ट केले आहे.
“माझा रोष वेगळ्या लोकांवर होता” – जनार्दनचा खुलासा
या दुर्घटनेत चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र, जनार्दनने तपासात दिलेल्या जबाबात सांगितले की, त्याचा रोष वेगळ्या लोकांवर होता आणि ज्यांचा मृत्यू झाला ते त्याच्या वैयक्तिक वादात सहभागी नव्हते. “माझा हेतू फक्त कंपनीला धडा शिकवण्याचा होता, कोणाचा जीव घेण्याचा नव्हता,” असे त्याने सांगितले.
या संपूर्ण घटनेवर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. पोलिस तपास सुरू असून, सत्य लवकरच बाहेर येईल, अशी अपेक्षा आहे.