
आपण स्वतः कोणालाही पाठींबा दिलेला नाही. त्याचबरोबर मराठा समाजानेही लोकसभा निवडणुकीत कोण्या पक्षाची बाजू घेतलेली नाही. कोणत्या अपक्ष उमेदवाराच्या पाठीशीही समाजाने पाठबळ लावलेले नाही.
आमच्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही सारखेच आहेत. आपण ना महायुतीला पाठींबा दिला आहे ना महाविकास आघाडीला, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
तुळजाभवानी देवीची धाकटी बहिण अशी ख्याती असलेल्या येरमाळा येथील येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा सध्या सुरू आहे. जरांगे पाटील यात्रेच्या निमित्ताने येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येरमाळा येथे आले होते.
त्यांच्या समवेत जिल्ह्यातील मराठा बांधवही बहुसंख्येने उपस्थित होते. दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची भूमिका जाहीर केली.
या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा कोणत्याही एका पक्षाला पाठींबा नसल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला. आपण स्वतः राजकारणात नसल्याने मंत्री छगन भुजबळ यांच्यासह कोणाला पाडा किंवा कोणाला पाडू नका, असे जाहीर आपण सांगितलेले नाही.
महाविकास आघाडी असो अथवा महायुती दोन्ही घटक आपल्यासाठी सारखेच आहेत. या निवडणुकीत आपली कोणतीही राजकीय भूमिका नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.