कोरोना काळात सर्वांनी सलोखा, एकजूट दाखवली. महापुरावेळी भेदभाव न करता माणुसकी जपत लोकांना मदत केली. हा विचार कोल्हापूर पुरता मर्यादीत न ठेवता राज्यात आणि देशात गेला.
असे असताना कोल्हापुरात दंगल घडली की घडवली, हे बघण्याची गरज सरकार आणि प्रशासनाला आहे, असे आमच्या सर्वांचे मत आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज (दि.१०) येथे दिली. रोहित पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
कोल्हापुरात दंगल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकारी उशीरा येत असतील. दंगल होण्याची शक्यता असताना पोलिसांना लागणारी आवश्यक वाहने जर नसतील, तर यामागे शासनाचे काही तरी चुकत आहे. त्यामुळे ही दंगल घडली की घडवली., हे तपासण्याची गरज आहे.
दंगलीत सामन्य लोकांचे घर जळते, दुकान जळते, कुटुंब उद्ध्वस्त होते, असे पवार म्हणाले. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्याला जर धमकी येत असेल, तर राज्यातील सर्वसामान्य लोकांची काय परिस्थिती असेल. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.
अपहरण, बलात्कार, खून, दरोडा या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आजची परिस्थिती बघता राज्यात प्रेसिंडेंट रूल कसा आणता येईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. राज्यात नोकऱ्या, महागाईबाबत कुणी बोलत नाही. भाजप संविधानाच्या विरोधात लोकांना भडकावत आहे.
चुकीचा विचार पसरवत आहे, असा आरोप करून पवार यांनी भाजपच्या या विचारांना कर्नाटकात धुडकावून लावल्याचे सांगितले. खोट्य बातम्यांवर छोट्या विचारांचे छोटे नेते बोलत आहेत. तुमची झोप उडेल, हे नक्कीच आमचे कार्यकर्ते बघून घेतील, असा इशारा पवार यांनी भाजप आमदार नितेश राणे यांचे नाव न घेता लगावला.