मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार ; पाच जणांचा मृत्यू ; गृहमंत्री अमित शहा मणिपूर दौऱ्यावर

Photo of author

By Sandhya

अमित शहा

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. हिंसाचाराच्या ताज्या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी चार दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर गेले आहेत. यादरम्यान, ते राज्यातील परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी योजना आखण्यासाठी सुरक्षा-संबंधित बैठका घेतील.

मणिपूरमध्ये 3 मे रोजी वांशिक संघर्ष सुरू झाल्यानंतर अमित शाह यांचा ईशान्येकडील राज्याचा हा पहिला दौरा आहे. गृहमंत्री अमित शाह 29 मे ते 1 जून या कालावधीत राज्यात राहणार आहेत.

ते परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी सुरक्षा बैठका घेतील आणि सामान्य स्थिती पूर्ववत करण्यासाठी पुढील कारवाईची योजना आखतील. नागरी समाजाचे प्रतिनिधी आणि मेईतेई आणि कुकी समुदायातील विविध गटांनादेखील ते भेटण्याची अपेक्षा आहे.

नुकतेच आसाममध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करताना शाह यांनी आपण लवकरच मणिपूरला जाणार असल्याचे सांगितले होते. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी इंफाळ येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, सध्या सुरू असलेल्या संकटावर तोडगा काढण्यासाठी शाह मणिपूरला भेट देणार आहेत.

अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा मिळावा या मागणीसाठी मेईतेई समुदायाने 3 मे रोजी पहाडी जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मार्च’ आयोजित केल्यापासून मणिपूरमधील जातीय संघर्षात 75 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मणिपूरची 53 टक्के लोकसंख्या मेईतेई समुदायाची आहे आणि ते प्रामुख्याने इंफाळ खोऱ्यात राहतात.

आदिवासी-नागा आणि कुकी लोकसंख्येच्या 40 टक्के आहेत आणि ते डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी रविवारी सांगितले होते की, सुरक्षा दलांनी राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी कारवाई सुरू केल्यापासून घरांची जाळपोळ आणि लोकांवर गोळीबार करणाऱ्या सुमारे 40 सशस्त्र अतिरेक्‍यांना ठार करण्यात आले आहे.

अमित शहा यांनी 15 मे रोजीच मणिपूरमधील हिंसाचाराच्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते आणि राज्यात चिरस्थायी शांतता सुनिश्‍चित करण्यासाठी केंद्राला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page