राज्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. राज्य सरकारकडून मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारकडून नवा अध्यादेश तयार करण्याबाबतची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या वर्षा या निवासस्थानी पार पडली. हा नवीन अध्यादेश लवकरच जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहचवण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं रात्री उशिरा मनोज जरांगे यांची भेट घेतली. जवळपास तीन तास शिष्टमंडळ आणि मनोज जरांगेंमध्ये चर्चा झाली. यावेळी सुधारित अध्यादेश मनोज जरांगेंना सुपूर्द करण्यात आला आहे.
दरम्यान, अध्यादेशामध्ये सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच, मनोज जरागेंच्या मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन थोड्याच वेळात उपोषण सोडणार असल्याची माहिती मिळत आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज नवी मुंबईत दाखल झाला आहे. आज वाशीत सरकारी अधिकारी आणि मराठा समाजेचे नेते यांच्यात चर्चा झाली होती. या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या.
त्यापैकी सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे सग्यासोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याचे पत्र देण्याची होती. याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
तब्बल साडे तीन तास चाललेल्या या बैठकीत याबाबत नवा अध्यादेश काढण्यात आला आहे. तसेच हा अध्यादेश मनोज जरांगे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
या बैठकीला मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आदी उपस्थित होते.