नाना पटोले : “विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा राज्यपातळीवरच होणार, मविआ हाच चेहरा”

Photo of author

By Sandhya

नाना पटोले

विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा अद्याप सुरु झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन लवकरच महाविकास आघाची बैठक आयोजित केली जाईल व त्या बैठकीत जागा वाटपाची चर्चा केली जाईल.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा राज्यपातळीवरच होईल असे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले असून निवडणुकीत महाविकास आघाडी हाच चेहरा राहील, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी खासदार व आमदारांची बैठक पार पडली.

या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पत्रकार परिषदेत बोलत होते. ते पुढे म्हणाले की, महाभ्रष्ट महायुती सरकारने राज्यातील आर्थिक, सामाजिक परिस्थिती बिघडवली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील महत्वाच्या जमिनी अदानीला दिल्या जात आहेत. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवून नेले.

शेतकरी संकटात आहे, भाजपाच्या राजवटीत शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून २० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकार शेतकऱ्यांचे कर्जमाफ करत नाही पण उद्योगपती अनिल अंबानी यांचे १७०० कोटी रुपयांचे कर्ज माफ करते, अनिल अंबानी काय सरकारचा जावई आहे का? असा सवाल विचारून सर्वात जास्त बेरोजगारी महाराष्ट्रात आहे.

कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. महायुती सरकारने महाराष्ट्राची अधोगती केली आहे. राज्यात धार्मिक तेढ निर्माण करुन राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरु आहे.

भारतीय जनता पक्षानेच २०१४ पासून फेक नेरेटिव्ह पसरवले आहे पण भाजपाच्या प्रत्येक फेक नेरेटिव्हला काँग्रेस जशास तसे उत्तर देईल. भारतीय जनता पक्षाला निवडणुकीतच छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते. आता विधानसभा निवडणूक असल्याने शिवाजी महाराजांची वाघनखे आणल्याचा देखावा करत आहेत.

ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत हे इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत यांनी स्पष्ट केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच महापुरुषांचा अपमान भाजपाच्या नेत्यांनी केला. तत्कालीन राज्यपाल कोश्यारी, भाजपाचे मंत्री व नेत्यांनी महापुरुषांचा सातत्याने अवमान केला हे राज्यातील जनता विसरलेली नाही.

छत्रपतींचे भव्य स्मारक अरबी समुद्रात करण्याची गर्जना करुन पंतप्रधान मोदींच्या हस्ते जलपूजन केले पण अद्याप स्मारकाची एक वीट रचली नाही. अरबी समुद्रातील शिवस्मारक कधी करणार? याचे उत्तर भाजपाने आधी द्यावे, असेही नाना पटोले म्हणाले. सारथी, बार्टी मधून पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महायुती सरकारने दोन वर्षांपासून फेलोशिप दिलेली नाही.

पीएचडी करून काय दिवे लावणार काय? असा अपमान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी केला होता. हे सरकार नोकर भरतीही करत नाही, कंत्राटी भरती प्रक्रिया रद्द केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती पण सात-आठ महिन्यातच पुन्हा कंत्राटी नोकर भरती सुरु करून भाजपाप्रणित खोके सरकार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळत आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

Leave a Comment