प्रकाश आंबेडकर : ‘स्वत:च्या ताकदीवर लढून टिकण्याचा मार्ग स्वीकारला’

Photo of author

By Sandhya

प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीत सपशेल अपयश आले. या अपयशाबाबत खुलासा करताना प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीने देऊ केलेल्या अकोल्याच्या जागेवर गेम होऊ शकला असता, असा संशय व्यक्त केला आहे.

इंडिया आघाडीबरोबर जाऊन पडणे आणि स्वत:च्या ताकदीवर लढणे यात फरक आहे. स्वत:च्या ताकदीवर लढून टिकण्याचा मार्ग कायम राहतो आणि म्हणून आम्ही टिकण्याचा मार्ग स्वीकारला, असे त्यांनी मतदारांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या पराभवाची कारणमीमांसा करणाऱ्या पत्रात आंबेडकर म्हणतात, आम्ही जनतेचा जनादेश नम्रपणे स्वीकारला आहे. आम्ही निराश झालो आहोत; पण आशा सोडलेली नाही. महाविकास आघाडीतील काही घटकांनी जाणीवपूर्वक वंचित बहुजन आघाडीला आघाडीत सामावून घेतले नाही.

आम्हाला बैठकांसाठी आमंत्रित करण्यात आले होते; परंतु ते सर्व मीडिया आणि मतदारांसाठी होते. आम्ही त्यांच्या जाळ्यात अडकलो आणि मतदारांना आमचा झालेला अपमान आणि आमच्या पक्षाप्रती महाविकास आघाडीची संकुचित वृत्ती पटवून देण्यात सपशेल अपयशी ठरलो, असे त्यांनी नमूद केले.

महाविकास आघाडीच्या शेवटच्या बैठकीत आघाडीने २ जागा वंचित बहुजन आघाडीला देत असल्याचे सांगितले. त्यातील एक जागा अकोला आणि दुसरी उत्तर मुंबई होती. त्यांचे नेते माध्यमाशी बोलताना या जागांचा आकडा ४ ते ६ सांगायचे. ते ज्या जागांचा उल्लेख करायचे, त्यात आम्हाला २०१९ मध्ये एक लाखाच्या वर मतदान मिळालेली एकही जागा नसायची, असे आंबेडकर यांनी नमूद केले.

Leave a Comment