
पुणे: विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट सध्या जोरदार गाजतो आहे. या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन २०० कोटीच्या जवळपास पोहोचले असून देशभरात आणि देशाबाहेरही ‘छावा’ हाऊसफुल सुरू आहे. यादरम्यान महाराष्ट्रात ‘छावा’ चित्रपट करमुक्त केला जावा अशी मागणी केली जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीबद्दल माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली, ते पुण्यात बोलत होते.
१९ फेब्रुवारी रोजी माध्यमांशी बोलताना त्यांनी सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. देवेंद्र फडणवीस यांनी असे म्हटले की, ‘जगभरातील शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. छत्रपती होते म्हणून आम्ही आहोत, छत्रपतींनी आम्हाला आत्माभिमान दिला.’ महाराजांकडून राज्यकारभार, वनसंवर्धन, जलसंवर्धन, करप्रणाली, सुरक्षा, समुद्री सुरक्षा या गोष्टी शिकता आल्या, याविषयी त्यांनी भाष्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणूनच आम्ही राज्यकारभार करत आहोत, असे फडणवीस म्हणाले.
‘छावा’ चित्रपटाविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मला आनंद एका गोष्टीचा आहे की, छत्रपती संभाजी महाराज ज्यांचं शौर्य, विरता आणि विद्वत्ता प्रचंड होती, पण इतिहासाने त्यांच्यावर मोठा अन्याय केला. असे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांच्याबद्दल ‘देश धरम पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था। महा पराक्रमी परम प्रतापी, एक ही शंभू राजा था’, असं म्हटलं गेलं… त्यांच्यावर अतिशय चांगला, मी अजून स्वत: पाहायचा आहे, पण ज्यांनी पाहिला त्यांनी सांगितलं की, इतिहासाशी कुठलीही प्रतारणा न करता ऐतिहासिक असा सिनेमा तयार झाला आहे. त्याबद्दल सिनेमाचे निर्माते, दिग्दर्शक आणि प्रमुख भूमिका करणारे विकी कौशल यांचे मानापासून अभिनंदन करतो’.
‘छावा’ सिनेमा करमुक्त करण्याविषयी ते म्हणाले की, ‘मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे की, हा सिनेमा टॅक्स फ्री करा. पण मी महाराष्ट्रातील जनतेला सांगू इच्छितो की, इतर राज्य जेव्हा चित्रपट टॅक्स फ्री करतात तेव्हा जो करमणूक कर असतो तो माफ केला जातो. महाराष्टाने २०१७ सालीच निर्णय घेतला आणि राज्यात करमणूक कर हा नेहमीकरिता रद्द केला आहे, त्यामुळे आपल्याकडे करमणूक करच नाही आहे. त्यामुळे अशाप्रकारची माफी देण्यासाठी असा करच आपल्याकडे नाही. या चित्रपटाच्या प्रमोशनकरिता किंवा छत्रपती शंभू राजेंचा इतिहास हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवण्यासाठी आम्हाला अधिक काय चांगलं करता येईल ते आपण करू’.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने शिवनेरी किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीसांनी ‘छावा’विषयी ही प्रतिक्रिया दिली.