भाजपचे अटकेत असलेले आमदार गणपत गायकवाड यांनी आपण मुख्यमंत्र्यांकडे कोट्यवधी रूपये जमा केले असल्याचे म्हटले आहे. मग या प्रकरणात मनिलॉंड्रिंग कायद्यानुसार कारवाई का केली जात नाही, आता ईडी, सीबीआय, गृहमंत्रालय आर्थिक गुन्हे शाखा ही सारी यंत्रणा कोठे आहे असा सवाल ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
आज येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे किती रूपये जमा केले आहेत ती माहिती बाहेर यायला हवी. मनिलॉंड्रिंग कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी पुरावे लागत नाहीत.
एखाद्या व्यक्तीचे वक्तव्य पुरेसे असते. आम्हालाही तेवढ्याच आधारावर अटक झाली आहे. मग मुख्यमंत्र्यांवर कोण कारवाई करणार असा सवाल त्यांनी केला.
माझे कोट्यवधी रूपये एकनाथ शिंदे यांच्याकडे पडलेले आहेत असे स्पष्ट वक्तव्य गणपत गायकवाड यांनी केले आहे. हे वक्तव्य आधार घेऊन आता ईडीने त्यांच्यावर कारवाई करावी असे राऊत यांनी म्हटले आहे.
आमच्या माहितीनुसार त्यांच्याकडे पोहचलेले रकमेचा आकडा शंभर कोटी रूपयांच्या वर जातो आहे असा दावाही राऊत यांनी केला. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आता वर्षा बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांच्याकडे या गुन्हेगारीतून जमवण्यात आलेल्या पैशाचा त्यांना जाब विचारावा असे आव्हानही राऊत यांनी दिले.