
सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. या घटनेचा शिवप्रेमींसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही कडाडून निषेध केला होता.
अशातच काल महाराष्ट्र दौऱ्यावर आले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवरुन जाहीर सभेत माफी मागितली. मात्र ही माफी राजकीय असल्याची टीका करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले संजय राऊत? “पंतप्रधान मोदींनी पाहिलं असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सिंधुदुर्ग किल्ल्याच्या राजकोटवरून ज्या पद्धतीने कोसळला आणि संतापाचा लावा इथे महाराष्ट्रात उसळला. त्याच्यामुळे जर आपण माफी मागितली नाही तर भविष्यात महाराष्ट्रातल्या संतापाला तोंड द्यावे लागेल त्याच्यामुळे काल त्यांनी राजकीय माफी मागितली,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
कालची माफी राजकीय… तसेच “प्रधानमंत्री यांची माफी राजकीय माफी आहे, उद्याच्या निवडणुका विधानसभेच्या डोळ्यासमोर ठेवून माफी मागितलेली बरी.
याच्यामध्ये फार मोठी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम, महाराष्ट्राविषयी प्रेम आत्मियता हे असण्याचं कारण नाही, माफी मागून जर प्रश्न सुटत असेल तर माफी मागून टाका असा सल्ला त्यांना या राज्यातल्या लोकांनी दिला प्रधानमंत्री यांनी मागितलेली माफी ही पूर्णपणे राजकीय स्वरूपाची आहे,” असे राऊत म्हणाले.
उद्यापासून ‘मविआ’चे आंदोलन! तसेच “छत्रपती शिवाजी महाराजांचा या महाराष्ट्रात अपमान या सरकारकडून झाला आहे. मोदींनी त्यांच्या काम केलं, आता महाराष्ट्र महाराष्ट्राचे काम करेल. मोदींनी जरी माफी मागितली असेल. तरी उद्यापासून या राज्यभरात सरकारला जोडे मारण्याचा आंदोलनाचा कार्यक्रम आहे. त्यात कोणत्याही बदल नाही.
उद्या अकरा वाजता सन्माननीय शरद पवार, माननीय उद्धव ठाकरेसाहेब, नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीतली सर्व घटक लाखो कार्यकर्ते एकत्र येतील आणि छत्रपती शिवरायांच्या अपमानाबद्दल सरकारला जोडे मारतील,” असा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी दिला.