सतेज पाटील : काँग्रेसचा कोणताही नेता भाजपमध्ये जाणार नाही याची मला खात्री आहे

Photo of author

By Sandhya

सतेज पाटील

काँग्रेस अभेद्य असून कोणताही नेता भाजपमध्ये जाणार नाही याची मला खात्री आहे. असा विश्वास व्यक्त करत जनतेच्या प्रश्नांसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. असे विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आम.

सतेज पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. आ. ऋतुराज पाटील, आ. जयश्री जाधव यावेळी उपस्थित होते.

आ. पाटील म्हणाले, काँग्रेससह मविआच्या प्रमुख नेत्यांची नुकतीच बैठक झाली. राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळली आहे. सामान्य लोकांचे प्रश्न रखडले असून, बेभरवशाच्या पावसामुळे शेतकरी चिंतेत आहे.

राज्यकर्त्यांचे याकडे लक्ष नसून मविआ म्हणून एकत्रितपणे सामान्यांचे प्रश्न मांडण्याचे काम करू. खराब रस्ते, नोकर भरती, शिक्षक भरती असे अनेक प्रश्न सुटलेले नसून विरोधी पक्ष म्हणून ते आम्ही ठामपणे मांडू. विधीमंडळातील विरोधी पक्षनेते पदाबाबत बोलताना ते म्हणाले, मविआचे नेते शरद पवार यांनी यापूर्वीच ज्यांची संख्या जास्त त्यांचा विरोधीपक्ष नेता असे स्पष्ट केले आहे.

येत्या अधिवेशनापूर्वीच हा प्रश्न निकाली लागेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. महाविकास आघाडी एकसंघपणे राहणार असून, आगामी निवडणुकाही एकत्रितपणे लढू. वज—मूठ सभेबाबत ते म्हणाले, सध्या पक्षीय स्तरावर सभा होत असून, पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर मविआच्या वज—मूठ सभाही घेतल्या जातील.

Leave a Comment