
महाराष्ट्रात ५ टप्प्यांत लोकसभा निवडणुका घेण्याचे कारण काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष, खासदार शदर पवार यांनी उपस्थित केला. राज्यकर्ते चिंतेत आहेत.
कमी जागा मिळण्याच्या भितीनेत राज्यात ५ टप्प्यांत निवडणुका घेतल्या जात असल्याचा दावाही त्यांनी केला. शरद पवार कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. मतदानाच्या घटलेल्या टक्केवारीबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
मतदानाची टक्केवारी काळजी करण्यासारखी आहे. कडक उन्हामुळे मतदानाच्या टक्केवारीत घट झाली असावी, असेही त्यांनी नमूद केले आहे. नागपूरपेक्षा गडचिरोतील मतदान जास्त ही विचार करण्याची गोष्ट आहे. गडकरी यांच्यासारखे नेते असतानाही नागपूरमध्ये मतदान कमी झाल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राज्यातील जनता विशेषतः शेतकरी पीएम मोदींवर नाराज आहे. मूळ मुद्दे बाजूला ठेवून लोकांची दिशाभूल करण्याचे काम सुरु आहे. जनतेला विभाजित करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ गांधी मैदानामध्ये शिव- शाहू निर्धार सभा आयोजित केली होती. या सभेत त्यांनी संबोधित केले.
‘महाराष्ट्रातील जनता हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही’ देशाने अनेक पंतप्रधान पाहिले आहेत. त्यांनी राज्यांत जाऊन राज्यांच्या उभारणीबाबत, विकासाबाबत मते मांडली. पंरतु, सध्याचे पंतप्रधान त्यावर काही बोलत नाहीत.
त्यामुळे कितीही वेळा पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात आले आणि त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले, तर हा महाराष्ट्र संधी मिळाल्यानंतर त्यांना आपला हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात शदर पवार यांनी पंतप्रधान मोदींवर बुधवारी केला.