वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच २२ जानेवारी २०२४ या दिवशी अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या तिघांच्या उपस्थितीत तसंच साधू-संतांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
त्यातच परवा अयोध्येतल्या मंदिरात रामनवमी साजरी झाली आणि सूर्यतिलक सोहळाही पार पडला. दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवीन सवाल करत भाजपवर हल्लाबोल केलाय. रामाच्या मंदिरात सीतेची मूर्ती का नाही? असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केलाय. मग सीतेची मूर्ती का बसवत नाही?
याविषयी बोलताना शरद पवार यांनी,“एका मिटिंगमध्ये माझ्यापुढे विषय निघाला त्यात महिलांनी अशी तक्रार केली की रामाचं सगळं बोलत आहात मग सीतेची मूर्ती का बसवत नाही? मी महाराष्ट्रात फिरतो आहे. मला अनुकूल चित्र दिसतं आहे. राम मंदिर होऊन गेलं आता त्याविषयी लोकांमध्ये चर्चा नाही.
तसंच या सरकारविषयी नाराजी आहे.” असं शरद पवार म्हणाले. शरद पवारांना राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा ठरेल का? हा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे.
अनेक मुद्द्यांना घातला हात “कांद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यंदा देशात साखरेचं उत्पादनही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर झालं. निर्यातीचा प्रश्न आहे. शेतीमालल बाहेर गेला पाहिजे, शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे अधिकचे पडले पाहिजेत या गोष्टीला या सरकारचा विरोध आहे. शेतकऱ्यांना वर्षातून एकदा सहा हजार रुपये द्यायचे, पण खतांचे दर वाढतात, औषधं महाग झाली आहेत,
मजुरी महाग झाली आहे याकडे कोण बघणार?” असाही प्रश्न शरद पवारांनी उपस्थित केला. दरम्यान, आता शरद पवारांच्या या प्रश्नावर भाजपकडून नेमके काय उत्तर येते हे पाहणे गरजेचे आहे.