
महाराष्ट्रातील रायगड आणि नाशिक जिल्ह्यांसाठी पालकमंत्रीपदाची नियुक्ती सध्या स्थगित करण्यात आली आहे. रायगडमध्ये अदिती तटकरे यांच्या नियुक्तीनंतर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस दरम्यान वाद निर्माण झाला, तर नाशिकमध्ये दादा भुसे यांच्याऐवजी गिरीश महजान यांची निवड करण्यावरून भाजप आणि शिवसेनेत मतभेद निर्माण झाले. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विरोध आणि निदर्शने झाल्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला आता स्थगिती देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून ही स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पालकमंत्रीपदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अदिती तटकरे यांच्या निवडीला शिवसेनेकडून ( शिंदे गट) विरोध झाला. तर नाशिकमध्येही दादा भुसे यांना डावलण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. त्यामुळे सध्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून घेण्यात आला आहे.
रायगडमध्ये पालकमंत्रीपदावरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू आहे. अदिती तटकरे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर भरत गोगावलेंकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. महाड विधानसभा संघातील सर्वच पदाधिकाऱ्यांकडून सामूहिक राजीनामे देण्यात आले. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर टायर जाळत शिवसैनिकांनी निदर्शनं केली.
तसेच नाशिकमध्येही पालकमंत्रीपदावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. दादा भुसे यांना डावलून गिरीश महजान यांना नाशिकचं पालकमंत्रीपद दिल्याने कार्यकर्ते नाराज आहेत