एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या बंडामुळे शिवसेनेमध्ये दोन गट पडले. शिवसेनेच्या बंडानंतर ‘५० खोके, एकदम ओके’ अशा घोषणा दिल्या जाऊ लागल्या. या घोषणेविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
ज्याच्यावर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ५० खोके, एकदम ओकेची घोषणा देणे म्हणजे गुन्हा नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. तसेच याप्रकरणी नोंदवलेला गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला आहे.
नेमकं काय घडलं? शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार मार्च महिन्यात जळगाव जिह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ॲडव्होकेट माळी यांच्यासह ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी सत्तार यांच्या वाहनाचा ताफा येताच ‘50 खोके एकदम ओके’ अशा घोषणा दिल्या. याप्रकरणी शिवसैनिकांसह वकील शरद माळी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता.
त्यानंतर पोलीस ठाण्यात नोंदवलेला हा गुन्हा रद्द करण्यासाठी ॲडव्होकेट शरद माळी यांनी याचिका केली होती. यावर मुंबई हायकोर्टात न्या. एस. जी. चपळगावकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी ॲडव्होकेट माळी यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करत त्यांना दिलासा दिला. प्रत्येक आंदोलन हे सामाजिक शांततेचा भंग करण्यासाठी केलेले नसते, सरकारने अपेक्षा भंग केल्यास उद्रेक तर होणारच, असे कोर्टाने म्हटले आहे.