Villages lost on the map are now visible to the world; Suyash Trust has given ‘Google Pin’ recognition to 345 villages

Photo of author

By Sandhya

नकाशावर हरवलेली गावे आता जगासमोर; सुयश ट्रस्टने ३४५ गावांना दिली ‘गूगल पिन’ची ओळख

दुर्गम गावांचा डिजिटल प्रवास सुरू; सुयश चॅरिटेबल ट्रस्टने ३४५ गावे आणली जागतिक नकाशावर

गूगल पिन’मुळे दुर्गम गावांना नवी ओळख; सुयश चॅरिटेबल ट्रस्टचा ३४५ गावांना डिजिटल नकाशावर आणण्याचा उपक्रम

पुणे : देशातील दुर्गम व आदिवासी भागांमध्ये विकासाची गती वाढवण्यासाठी संपर्क आणि ओळख ही अत्यंत महत्त्वाची बाब मानली जाते. अनेक गावांमध्ये वीज, रस्ते, इंटरनेट आणि बाह्य जगाशी संपर्काची कमतरता असल्याने त्या गावांचे अस्तित्व नकाशावरही स्पष्ट दिसत नाही. अशा परिस्थितीत सुयश चॅरिटेबल ट्रस्टने ‘गूगल पिन’ नोंदवण्याचा अभिनव उपक्रम राबवून ३४५ दुर्गम गावांना जगाच्या डिजिटल नकाशावर आणले आहे. या उपक्रमामुळे या गावांची ओळख राष्ट्रीय व जागतिक स्तरावर निर्माण होत असून ग्रामविकासाला नवे बळ मिळत आहे.

सुयश चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष यशवंत घैसास, कार्याध्यक्ष स्मिता घैसास आणि शलाका घैसास यांच्या नेतृत्वाखाली ट्रस्ट गेल्या ४५ वर्षांपासून भारतातील आठ राज्यांमधील आदिवासी व दुर्गम भागांत सातत्याने काम करत आहे. शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, जलसंवर्धन आणि ग्रामविकास यांसारख्या विविध क्षेत्रांत संस्थेने उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यातच आता डिजिटल ओळख निर्माण करण्यासाठी ‘गूगल पिन’ नोंदवण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे.

गूगल पिन नोंदवण्याचे महत्त्व लक्षात घेता, या उपक्रमामुळे दुर्गम गावांचे अचूक स्थान नकाशावर दिसू लागते. त्यामुळे शासकीय योजना, आपत्कालीन सेवा, आरोग्यसेवा, शिक्षणविषयक उपक्रम तसेच स्वयंसेवी संस्थांची मदत या गावांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होते. एखाद्या गावाला मदत करायची असल्यास किंवा विकासकामे राबवायची असल्यास त्या गावाचा अचूक लोकेशन डेटा उपलब्ध होणे अत्यंत गरजेचे असते. गूगल पिनमुळे हा डेटा सहज मिळू लागल्याने प्रशासन आणि मदतनीसांना मोठी मदत होत आहे.

या उपक्रमामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्येही सकारात्मक बदल दिसून येत आहे. आपले गाव जगाच्या नकाशावर दिसत असल्याची भावना त्यांच्यात अभिमान निर्माण करते आणि विकासाच्या प्रवाहात सामील होण्याची प्रेरणा देते. तसेच विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि समाजसेवी संस्थांना या भागांपर्यंत पोहोचण्यासाठी स्पष्ट दिशा मिळते.

पुण्यातून कार्यरत असलेली सुयश चॅरिटेबल ट्रस्ट संस्था महाराष्ट्रासह देशातील आठ राज्यांमध्ये दुर्गम भागांत सातत्याने काम करत आहे. ४५ वर्षांच्या सेवेतून संस्थेने हजारो कुटुंबांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणला आहे. ‘गूगल पिन’च्या माध्यमातून दुर्गम गावांना जागतिक नकाशावर स्थान मिळवून देण्याचा हा उपक्रम सामाजिक कार्यातील नवा आदर्श ठरत असून विविध स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे. अजून अशी हजारो दुर्लक्षित गावे आगामी काळात गुगल पीनवर येणार आहेत. अशी माहिती सुयश चॅरिटेबल ट्रस्टकडून देण्यात आली.

Leave a Comment

You cannot copy content of this page