
लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) ही सत्तेपोसाठी आणलेली योजना असल्याचे वक्तव्य प्रहारचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केले आहे. सोयाबीन व कापसाचे भाव गडगडले आहेत, मात्र लाडक्या बहिणींना अॅडव्हान्स पैसे देता आणि कष्ट करणाऱ्या लोकांना पैसे देत नाही, अशी टीका कडू यांनी राज्य सरकारवर केली. दिव्यांग नागरिकांना सहा महिने झाले पैसे मिळाले नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
MPSC परीक्षांबाबतही सरकारवर निशाणा
MPSC परीक्षांबाबत देखील बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “राजकारणी आणि प्रशासनातील लोक याबाबत फार गांभीर्याने घेत नाहीत,” असे ते म्हणाले. “शहरातील युवक अभ्यास करून नोकरीसाठी प्रयत्न करत असतात, पण तरीही नोकरी मिळत नसेल तर काय? हातात बंदूक घ्यावी का?” असा संतप्त सवाल कडू यांनी उपस्थित केला.
“केंद्रात अजित पवारांपेक्षा शरद पवार आणि उद्धव ठाकरे सक्षम”
चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत विचारले असता, कडू म्हणाले की, “राज्यापेक्षा केंद्र सरकार महत्त्वाचे आहे. केंद्रात अजित पवारांपेक्षा शरद पवार आणि उद्धव ठाकरे सक्षम आहेत.”
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवारांची निवड झाल्याबाबत विचारले असता, कडू म्हणाले, “रामाचे मंदिर बांधून देशावर उपकार केले, पण खरे रामराज्य निर्माण झाले पाहिजे.” तसेच “अनेक वाल्मिक कराड आहेत, पण कष्ट करणारे उपाशी मरतात, हे दुर्दैवी आहे,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
“सत्तेतील माणूस राजीनामा मागतोय, पण सत्तेतील माणूस राजीनामा देत नाही”
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना कडू म्हणाले की, “ही देशातील पहिली घटना आहे, जिथे सत्तेतील माणूस राजीनामा मागतोय, पण सत्तेतील माणूस राजीनामा देत नाही.” काही लोक याचे राजकारण करत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संतोष देशमुख हत्या प्रकरण – मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही वाढला दबाव
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. “वाल्मिक कराड हेच सूत्रधार असल्याचा आरोप झाला आहे, त्यामुळे कोणत्याही दबावाखाली चौकशी होऊ नये,” असे कडू म्हणाले. याच कारणाने धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील आमदारांनी केली आहे.