



अकलूज, सोलापूर जिल्हा – ९ ऑगस्ट २०२५ : आज सकाळी सोलापूर वनविभाग आणि RESQ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त मोहिमेत अकलूज पाणीपुरवठा तलावातून एक मगरीचा (Crocodylus palustris) यशस्वीरीत्या बंदिस्त करण्यात आली. हा तलाव अकलूज शहर व आसपासच्या परिसरासाठी महत्त्वाचा पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत आहे.
ही कारवाई ८ जुलै २०२५ रोजी मुख्य वन्यजीव संरक्षक (Chief Wildlife Warden) यांनी मुख्य वनसंरक्षक (प्रा), पुणे वनवृत्त आणि उप वनसंरक्षक, सोलापूर वनविभाग यांना दिलेल्या निर्देशांनुसार करण्यात आली. निर्देशांमध्ये प्राण्याला कमीत कमी ताण देत आणि ३१ ऑगस्ट २०२५ पूर्वी पकडण्याचे सांगितले होते.
श्री. आशिष ठाकरे (IFS), मुख्य वनसंरक्षक (प्रा), पुणे वनवृत्त, महाराष्ट्र वनविभाग यांनी सांगितले :
“ही मगर तलावात कशी आली हे निश्चित सांगता येत नसले तरी, ती काही महिन्यांपासून येथे वास्तव्य करत असल्याची माहिती मिळाली होती. तलावाची क्षमता वाढवण्यासाठी होणाऱ्या बांधकामामुळे तिच्या सुरक्षित स्थलांतराची विनंती करण्यात आली होती. स्थानिक वनविभागाने केलेल्या प्राथमिक पाहणीनंतर RESQ CT च्या तज्ज्ञांनी पकड मोहिमेला गती देण्यासाठी तलावातील पाणी कमी करण्याची शिफारस केली.”
श्री. कुलराज सिंह (IFS), उप वनसंरक्षक, सोलापूर विभाग, महाराष्ट्र वनविभाग यांनी पुढे सांगितले :
“पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने लगेचच ही कृती करून आवश्यकतेनुसार पाणी कमी केले. यामुळे पथकाला मगरीची उपस्थिती निश्चित करण्यास व तिच्या जास्त वावरणाऱ्या भागांचे निरीक्षण करण्यास मदत झाली. २ ऑगस्ट २०२५ रोजी तीन पिंजरे योग्य ठिकाणी लावण्यात आले आणि आजच्या यशस्वी पकडीत ते कारणीभूत ठरले.”
रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका व अध्यक्ष नेहा पंचमिया म्हणाल्या :
“आज सकाळी मगर पिंजर्यात अडकलेली आढळली. सध्या तिला पुण्यातील बावधन येथील वन्यजीव ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये शारीरिक तपासणी व आरोग्य तपासणीसाठी आणले जात आहे. मोठ्या खुल्या जलाशयातून मगर पकडणे नेहमीच आव्हानात्मक असते. त्यासाठी संयम आणि परिस्थितीनुसार योजना बदलण्याची गरज असते. वनविभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आणि आमच्या पथकातील समन्वयामुळे ही जटिल मोहीम सुरक्षितपणे पार पडली.”
मगर कुठल्या योग्य नैसर्गिक अधिवासात सोडायची याचा अंतिम निर्णय महाराष्ट्र वनविभाग घेणार आहे.