अमोल कोल्हे : “फडणवीसांचे पंख दिल्लीच्या नेत्यांकडून छाटण्याचा प्रयत्न”….

Photo of author

By Sandhya

अमोल कोल्हे

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी रात्री राज्य सरकारच्यावतीने सर्वपक्षीय बैठक मुंबईत पार पडली. मात्र या सर्वपक्षीय बैठकीकडे विरोधकांनी पाठ फिरवली. यावरून आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले.

हा मुद्दा सत्ताधाऱ्यांनी विधानसभेतही उचलून धरला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारवर टीका केली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. काय म्हणाले अमोल कोल्हे ?

राज्यात अशांतता राहावी, असं विरोधकांना वाटत असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली होती. यावर बोलताना खासदार अमोल कोल्हे म्हणाले, “मला असे काही वाटत नाही.

माझ्याकडे या संदर्भातील काही माहिती नाही. कारण काल मी मतदारसंघात होतो. मात्र, यासंदर्भात महाविकास आघाडीची भूमिका स्पष्ट आहे. राज्यात सरकार महायुतीचे आहे, त्यांनी आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट केली पाहिजे.

त्यांनीच आरक्षणाचा प्रश्न भिजत ठेवला आहे, जनतेमध्ये संभ्रम करण्यापेक्षा सर्व घटकांना योग्य न्याय मिळेल असा तोडगा सरकारने काढणे गरजेचे आहे,” असे खासदार कोल्हे म्हणाले. पुढे ते म्हणाले, ” मुख्यमंत्री शिंदे यांनी ज्यावेळी मुंबईत मनोज जरांगे यांची भेट घेतली होती.

त्यावेळी या संदर्भात सविस्तर चर्चा झाली होती की नाही हे माहिती नाही. मात्र, त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. त्यामध्ये आपण बोलायचं आणि निघून जायचं, असं ते म्हणाले होते. मग यामध्ये त्यांची काय भूमिका आहे. हे स्पष्ट झाले पाहिजे.”

तसेच मुंबईतील काही स्थानकांची नावे बदलण्याचा प्रस्ताव देण्यात आला. यावर अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया दिली. “भाजप सरकारमध्ये नावे बदलणे, हेच धोरण दिसत आहे. नावे बदलून शहरात पाणी साचायचे थांबत नाही, विमानतळाचे छत कोसळणे थांबत नाही, रेल्वेचे अपघात थांबत नाही. त्यामुळे रेल्वे स्थानकांची नावे बदलण्यापेक्षा नागरिकांना सुविधा मिळणे महत्त्वाचे आहे,” अशी टीकाही अमोल कोल्हेंनी केली.

देवेंद्र फडणवीस नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकी होणार असल्याची चर्चा आहे, याबाबत विचारलेल्या  प्रश्नावर अमोल कोल्हे म्हणाले की, “जर अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्याचा प्रकार दिल्लीच्या नेत्यांकडून होत असेल तर तो महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे.”

Leave a Comment