रुपाली बडवे, साम प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बहिणींना लाडकी बहीण योजनेचं गिप्ट दिल्यानंतर आता भावांसाठी गिफ्ट दिलंय.
सौरपंप दिल्याने शेतकऱ्यांना आता वीज बिल देण्याची गरज नसल्याचं अजित पवार म्हणालेत. जर कोणी वीजबील मागायला आले तर त्यांना माझ्याकडे पाठवा, असा धीर देणारा शब्द दिला. अजित पवार हे दिंडोरी येथे जनसन्मान यात्रेच्या व्यासपीठावर बोलत होते.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आता शेतीचं वीजबिल भरावं लागणार नाही. तसेच आतापर्यंत थकबाकी असलेले बिल भरण्याची गरज नाही. राज्य सरकारच्या सौरपंप योजनेमुळे यापुढे शेतकऱ्यांना वीजेसाठी अवलंबून राहावे लागणार नसल्याचं अजित म्हणालेत.
सौरउर्जेच्या माध्यमातून एकही पैसा न भरता सौरपंपाचा वापर करुन आता शेतीला पाणी देता येईल. याचा फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मिळणार आहे, असा दावा अजित पवारांनी यावेळी केलाय.
दिंडोरी येथे बोलतांना अजित पवारांनी लाडक्या भावांनाही साद घालण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना आता शेतीसाठीच्या वीजेचे बील भरावे लागणार नाही. कारण आपण सौरपंपाची योजना सुरु केलीय.
त्यामुळे आतापर्यंत शेतीच्या पंपाचे आलेले बिल भरण्याची गरज नाहीये. जर कनेक्शन कापण्यासाठी कोणी आले तर त्याला सांगा अजितदादाने सांगितलंय, असं अजित पवार म्हणालेत.
पुढे बोलतांना अजित पवार म्हणालेत,कांदा निर्यात बंदी अजिबात बंद केली नाहीये. निर्यात सुरू ठेवायची आहे, टॅक्स लावला ते पण नको. दुधात ५ रुपये अनुदान सरकार देत आहे.
८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करत राहू. विरोधक टीका करत राहतील पण आम्ही काम करत राहू. इतके दिवस इतरांना संधी दिली आता आम्हाला संधी देऊन बघा मुलगा म्हणून भाऊ म्हणून आम्हाला आशिर्वाद द्या. आम्ही योग्य मार्गाने विकास करू असं अजित पवार म्हणालेत.