बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मयत आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह ठाण्यात तसेच कळव्यात पुरण्यास मनसेने विरोध केला आहे. ठाण्यात किंवा कळव्याच्या पवित्र भूमीत अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यात येऊ नये यासाठी मनसेच्या वतीने कळवा पोलिसांना पत्र देण्यात आले आहे.
त्याचा मृतदेह हा त्याच्या गावी पुरण्यात यावा अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. “पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यात येणार आहे, अशी माहिती या प्रकरणात अक्षयच्या वडिलांनी दिलेले वकील अमित कटारनवरे यांनी दिली आहे.
भविष्यात काही पुरावे लागले तर मृतदेह पुन्हा बाहेर काढता येईल. मात्र अक्षय शिंदेच्या आई वडिलांना त्याचा मृतदेह पुरण्यासाठीही जागा मिळालेली नाही.
मुलाला न्याय मिळवून द्यायचा अशी कुटुंबाची भावना आहे. कुटुंबाचीच ही भावना आहे की अक्षयचा मृतदेह पुरला जावा. त्यामुळे मृतदेहाचं दहन न होता तो पुरला जाणार आहे.”
त्यामुळे आता अक्षयचा मृतदेह पुरण्यासाठी जागेचा शोध सुरु करण्यात आला आहे. अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यासाठी ठाण्यात किंवा कळव्यात जागा शोधण्यात येत असली तरी, अक्षयचा मृतदेह पुरण्यासाठी ठाण्यात आणि कळव्यात पुरण्यास मनसेने विरोध केला आहे.
मनसेचे ठाणे शहर उपाध्यक्ष सुशांत सूर्यराव यांनी कळव्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना यासंदर्भात पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी अक्षयचा मृतदेह कळव्याच्या पवित्र भूमीत पुरण्यास नागरिकांचा आणि मनसेचा विरोध असल्याने त्याचा मृतदेह कळव्यात पुरु देणार नसल्याचे म्हंटले आहे. जर या ठिकाणी मृतदेह पुरण्याचा प्रयत्न केला तर नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.