जयंत पाटील : माणच्या निष्क्रिय आमदारांना घरचा रस्ता दाखवा…

Photo of author

By Sandhya

जयंत पाटील

माणचे आमदार सरकारच्या आशीर्वादाने भ्रष्टाचार करताहेत. कोरोना काळात मृत माणसांना उपचार करून घरी पाठवले, असा रिपोर्ट बनवून कोट्यवधी रुपये त्यांनी लाटले. राजेवाडी तलावातील शेतकर्‍यांच्या हक्काची माती एका विशिष्ट संस्थेच्या नावाखाली परस्पर विकण्यात आली.

अवैध वाळू उपशालाही त्यांनी थारा दिला, अशा निष्क्रिय आमदारांना घरचा रस्ता दाखवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केले.

दहिवडी येथील शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी खा. अमोल कोल्हे, मेहबूब शेख, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, माण खटाव निरीक्षक उत्तमराव जानकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, अभयसिंह जगताप, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील माने, संदीप मांडवे, डॉ. महादेव कापसे, विपुल गोडसे, सुनील गव्हाणे, अर्जुन खाडे, डॉ. महेश माने, मकरंद बोडके, सौ.कविता देशमुख, सौ.शालन जाधव उपस्थित होते.

आ. जयंत पाटील म्हणाले, मी मंत्री असताना कलेढोण आणि परिसरातील 48 गावांना पाणी देण्याचे काम केले आहे. 2.5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि आमचे सरकार गेले. नवीन सरकारने विलंब लावला. या सरकारला 15 वर्षात जिहे कठापूर योजना पूर्ण करता आली नाही.

मागील वर्षी आंधळी धरण भरले आणि ऐन दुष्काळात जनता मागणी करत असताना माणच्या आमदारांनी पाणी दिले नाही. याउलट जी ग्रामपंचायत माझ्याबरोबर नाही त्यांना पाणी द्यायचे नाही, असे धोरण त्यांनी आखले. खा. अमोल कोल्हे म्हणाले, भारतीय जनता पार्टीने ईडी सीबीआयचा वापर करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

परंतु या दहशतीला महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेने जुमानले नाही. लोकसभेला जनता झुकत नाही हे दाखवून दिले. आता विधानसभेलाही जनता या दहशतीला जुमानणार नाही. 570 कोटी जाहिरातीसाठी या सरकारने खर्च केलेत. हे फक्त जाहिरातबाजी करणारे सरकार आहे. महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता कोणासमोर झुकत नाही हे लोकसभेला जनतेने दाखवून दिले.

हरियाणामध्ये शेतकर्‍यांवर तारकाट आणि खड्डे करून आणि अश्रू धूर सोडून अन्याय केला. हे सरकार हिच परिस्थिती महाराष्ट्रमध्ये देखील आणेल, पक्ष फोडून महाराष्ट्र विकला, शेतकर्‍यांना कधीही न्याय दिला नाही. म्हणून या सरकारच्या राजकीय स्वप्नांना धूळ चारण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असे आवाहन खा. कोल्हे यांनी केले.

उत्तमराव जानकर म्हणाले, मी या मतदार संघाचा निरीक्षक आहे. मतदार संघात फिरत असताना अनेक ठिकाणी ऐकायला मिळाले की प्रशासनाला वेठीस धरून येथील लोकप्रतिनिधी त्रास देतायेत. परंतु या लोकप्रतिनिधीला घरी बसवण्यासाठी तुम्ही सर्वजण एकजूट करा. मी पण तुमच्या बरोबर आहे. अनेकजण इच्छुक आहेत.

परंतु पवारसाहेब एकच उमेदवार देतील त्याच्या पाठीमागे सर्वांनी उभे रहा, येथील आमदार तुमच्या विचाराचा असेल, असे ते म्हणाले. यावेळी आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, अभयसिंह जगताप, मेहबूब शेख, सुनील माने, दत्ता पवार यांनी मनोगत व्यक्त केले.

Leave a Comment