मौजे खामगाव येथे बिबट सदृश्य वन्यप्राण्याने केलेल्या हल्ल्यात श्री. तेजस रमेश म्हेत्रे यांच्या तबेल्यातील तब्बल १७ बोकड जागीच ठार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे पशुपालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे वनरक्षक ज्ञानदेव भोंडवे, वनरक्षक गणेश म्हस्के तसेच वनपाल यवत श्रीमती भाग्यश्री टोणपे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृत पशुधनाची पाहणी करून नियमानुसार पंचनामा करण्यात आला.
यावेळी श्री. शुभम राजेंद्र सणस, श्री. संकेत राजेंद्र मेत्रे, श्री. अभिजित रवींद्र लोखंडे, श्री. सुनील दत्तात्रय विधाटे, श्री. शेहनशा दिलावर शेख, श्री. समीर दस्तगीर शेख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
या हल्ल्यामुळे नुकसानग्रस्त पशुपालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, शासनाच्या नियमानुसार आवश्यक कार्यवाही करून एक महिन्याच्या आत नुकसानभरपाई देण्यात येईल, असे आश्वासन वनपरीक्षेत्र अधिकारी श्री. राहुल काळे यांनी दिले.
दरम्यान, परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिक व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी विशेष खबरदारी घ्यावी, पशुधन सुरक्षित ठिकाणी बांधावे तसेच रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
