
महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी ताकद लावली तरच महाराष्ट्रात मविआचे सरकार येईल. सरकार आल्यानंतर तुम्हाला पाहिजे त्याला मुख्यमंत्री करा, आताच कुणाला घाई नाही. जर आता सत्ता आली नाही, तर कुत्र पण विचारणार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे.
पलूस तालुक्यातील औदुंबरमध्ये काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम यांच्या प्रचार सभेत जयंत पाटील बोलत होते. पलूस कडेगाव मतदार संघात विकास भरपूर झाला आहे. तरी देखील आणखी काही विकास कामे असतील तर सांगा, असे आमदार कदम म्हणत असतात.
त्यामुळे कर्णाचा दुसरा अवतार म्हणजे विश्वजीत कदम आहेत, असे म्हणत जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे उमेदवार महाराष्ट्रात निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा, असे कार्यकर्त्यांना आवाहन केले.
राजकारण थोडस बाजूला ठेवा. लढायला, भांडायला भरपूर आयुष्य आहे. आता मात्र थोडासं मोठं मन ठेवा, भांड्याला भांड लागत असेल तर ते थोडसं बाजूला ठेवा. कुठल्याही परिस्थितीत अधिकृत उमेदवारांसाठी आपण सगळ्यांनी ताकद लावली पाहिजे. आज सत्ता येण्यासाठी एकेक आमदार महत्त्वाचा आहे.
जर सत्ता आली नाही तर कुत्र पण विचारणार नाही, असे म्हणत जयंत पाटील यांनी बंडखोरी करणाऱ्यांना एकप्रकारे इशारा दिला आहे. बंडखोरी करण्यासाठी आज जी लोकं मोठ्याने बोलत आहेत ती माणसं परत आवाज काढणार नाहीत. निवांत घरात जाऊन बसतील, रिटायर होतील, त्यामुळे छोट्या-छोट्या गोष्टीत मन अडकवू नका. आता सरकार येण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा, असेही जयंत पाटील म्हणाले.