विजय वडेट्टीवार : पराभव दिसत असल्याने फडणवीसांचे वाटेल ते आरोप…

Photo of author

By Sandhya

विजय वडेट्टीवार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसी संघटनांना शहरी नक्षलवादी म्हणत आहेत. हा सामाजिक संस्थांचा अपमान आहे. ओबीसी, दलित आदिवासी संघटना त्यांना शहरी नक्षलवादी दिसतात. फडणीस यांनी चौकशी करावी तोंडाच्या बाता करू नयेत. ते गृहमंत्री आहेत, त्यांना चौकशी करायला कोण थांबवणार.

पराभव दिसत असल्याने वाटेल ते आरोप करण्याचा धंदा भाजपचा झालेला आहे, असे प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला दिले.

राहुल गांधींचा आजचा कार्यक्रम सामाजिक संस्थांनी आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम राजकीय नाही, पूर्णतः संविधान आणि सामाजिक संस्थांवर आहे. विरोधकांना दुसरे काम नाही, भाजप, आरएसएस खोटं बोलण्याशिवाय दुसरं काही करत नाही. देशाला कर्जबाजारी आणि उद्ध्वस्त केलं आहे. त्यांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही. राहुल गांधींना चॅलेंज करणे, हे चुकीच वक्तव्य आहे. आम्ही त्याला महत्त्व देत नाही, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

शेतकऱ्यांचा महायुतीच्या कर्जमाफीवर विश्वास नाही

आता शेतकरी कर्जमाफीच्या घोषणा केल्या जातात, मात्र तीन वर्ष सत्तेत होते, त्यावेळी या योजना का आणल्या नाहीत. दहा वर्ष सत्तेची खुर्ची उपभोगत असताना या गोष्टी यांना आठवल्या नाहीत. एकनाथ शिंदे २३ तारखेपर्यंत मुख्यमंत्री आहेत, त्यानंतर शिंदे मुख्यमंत्री नसतील. त्यामुळे या योजनांची पूर्तता आम्ही करणार. गृहमंत्री अमित शहा यांनी शेतकरी कर्जमाफीला उघड विरोध केला होता.

अमित शहा विरोध करत असताना कर्जमाफीच्या गोष्टी करत असाल तर शेतकरी विश्वास ठेवेल का ? भाजपचा महायुतीच्या जाहीरनामाला पाठिंबा आहे का हे स्पष्ट करावे, असे वडेट्टीवार म्हणाले. ज्या राज्यात भाजपचे सरकार आहे, त्या एकाही राज्यात शेतकरी कर्जमाफी झाली नाही. निवडणुकीत पराभव दिसत असल्याने अर्थहीन वक्तव्य केली जात आहेत.

महाराष्ट्रात सर्वाधिक घोटाळे शिंदे सरकारमध्ये झाले. पाच लाख कोटींच्या जमिनी गुजरातच्या उद्योगपतींना कवडीमोल दरात दिल्या, सात लाख कोटींचे टेंडर तीस-पस्तीस टक्क्यांनी वाटले. गुजरातच्या चरणी नतमस्तक झालेले नतंभृष्ट हे लोकांना काय देणार. कर्जमाफी करतील यावर लोकांना विश्वास नाही.

राज्याला एक नंबरवर आणणे काँग्रेसची गॅरंटी आज मविआचा जाहीरनामा आणि काँग्रेसची गॅरंटी सादर केली जाईल. शेतकरी, महिला, बेरोजगार अशा पाच गॅरंटीचा त्यात समावेश असेल ११ नंबर वर गेलेले राज्य पुन्हा नंबर एकवर आणण्याचा प्रयत्न या गॅरंटीमधून केला जाणार आहे. विदर्भात आम्ही २५ ते ४६ जागा जिंकणार आहे. आमच्या वेगवेगळ्या सर्व्हेमधून ही माहिती समोर येत असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

Leave a Comment