शिर्डीत रायगडचे पत्रकार धम्मशील सावंत नानक साई अवॉर्ड 2026 ने सन्मानित

Photo of author

By Sandhya

Raigad journalist Dhammasheel Sawant honored with Nanak Sai Award 2026 in Shirdi

साईबाबा शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, समाजसेविका तृप्ती देसाई, पंढरीनाथ बोकरे यांच्या हस्ते देण्यात आला पुरस्कार

शिर्डीच्या भूमीत राज्यातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान मान्यवरांना गौरविण्यात आले ही बाब कौतुकास्पद आहे. स्वराज्य व क्रांतीभूमी असलेल्या रायगडातील निर्भीड पत्रकार धम्मशील सावंत हे सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज असून त्यांच्या आजवरच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना नानक साई अवॉर्ड 2026 पुरस्काराने गौरविल्याने येत्या काळात त्यांना अधिक बळ व प्रोत्साहन मिळेल असे प्रतिपादन भूमाता ब्रिगेड च्या प्रमुख तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केले.

नानक साई फाऊंडेशन या संस्थेतर्फे शिर्डी येथे विशाल साई भक्त संमेलन आयोजित करण्यात आले होते.नानक साई फाउंडेशन तर्फे शिर्डीत ७ व्या ‘नानक साई पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन केले होते.या संमेलना चे उद्घाटन साईबाबा शिर्डी संस्थान मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमात कला, संस्कृती, समाजसेवा, अध्यात्म आणि पत्रकारिता या क्षेत्रांतील उत्कृष्ट कार्यासाठी व्यक्ती आणि संस्थांचा नानक साई अवॉर्ड देऊन सन्मान केला.

धम्मशील सावंत यांनी त्यांच्या पत्रकारितेत कोकणातील स्थानिक, प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या मूलभूत प्रश्नांना चव्हाट्यावर आणलं. प्रतिकूल संसाधनांमध्ये धम्मशील सावंत यांनी कोकणातील महत्वाचे प्रश्न मांडले. कोकणची अस्मिता अधिक टोकदार केली. प्रसंगी धनदांडग्यांना शिंगावर घेण्याचे काम केले. भांडवलदार आणि गरीब असा संघर्ष जेंव्हा उभा राहतो तेंव्हा धम्मशील सावंत एका क्षणात गरिबांच्या बाजूने उभे राहत धनदांडयांना आपल्या शिंगावर घेतात.
त्यांनी आजपर्यंत कोकणातील आदिवासी जनतेच्या मूलभूत समस्या, मच्छीमारांचे ज्वलंत प्रश्न, मिठागर व्यावसायिकांच्या समस्या, आंबा बागायतदार,कोकणातील शेतीला धोक्यात आणणारा बांध बंदिस्तीचा मूलभूत प्रश्न, आरोग्याचे मूलभूत प्रश्न, मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न, शहरातील महिला भाजी विक्रेत्यांच्या समस्या असे अनेक प्रश्न मुख्य पटलावर आणले. निवडणूक काळात केवळ राजकीय नेत्यांच्याच मुलाखती न घेता त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांची सखोल चर्चा घडवून आणली.त्यांनी अनेक आघाडीच्या माध्यमांमध्ये काम केले आहे. त्यांनी महाराष्ट्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे. केवळ पत्रकारिता क्षेत्रात मर्यादित न राहता त्यांनी सामाजिक क्षेत्रात देखील भरीव योगदान दिले आहे. अनेक आंदोलनांमध्ये सहभाग घेतला आहे. अनेक स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिला आहे. धम्मशील सावंत या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात दिलेल्या योगदानाबाबत शिर्डीत नानक साई फाउंडेशन पुरस्कार 2026 या मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

या पुरस्कार सोहळ्यास
शिर्डीच्या नगर अध्यक्षा सौ जयश्री थोरात, शिर्डी संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, शिर्डीचे प्रथम नगरअध्यक्ष काकासाहेब कोते, माजी उपनगर अध्यक्ष विजय भाऊ कोते, नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे, सुरेश वाबळे, साईभक्त दिलीप कंदकुर्ते, राजकुमार चौगुले, नामदेव कुंभार, पंढरीनाथ पगार, सुनील निकम, सरदार प्रितम सिंघ भाटिया, साईप्रसाद खांडरे, सौ प्रफुल्ला बोकारे, पंकज लोढा, संजय कदम रुईकर, धनंजय उमरीकर, विनायक भोसले, प्रभाकर केसरकर, नागेश वायदंडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Comment

You cannot copy content of this page